Kishor Kadam : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला 'झुंड'  (Jhund) हा चित्रपट आज (4 मार्च) मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे. या चित्रपटात कवी-अभिनेते सौमित्र अर्थात किशोर कदम (Kishor Kadam) यांनी देखील एक भूमिका साकारली आहे.


‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव व्यक्त करताना किशोर कदम यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरलीये. या पोस्टसोबतच त्यांनी सेटवरचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.


काय म्हटलंय पोस्टमध्ये?


‘यातल्या तिसऱ्या फोटो फ्रेम मध्ये अमिताभ बच्चन हा एकच माणूस तुम्हाला दिसत असेल. मलाही तोच दिसतो आहे. तो असेल त्या फ्रेममध्ये आजवर खरं सांगतो कुणीही आणि कितीही माणसं असली तरी मला तोच दिसत आलाय इतका तो माणूस माझ्या मनाच्या पडद्यावर मोठ्ठा कोरला गेलाय.


आजवर मी त्याला दोनदा भेटलो आहे. पहिल्यांदा आयबीएन लोकमत पुरस्कार मिळाला होता तेंव्हा आणि आता नागराजच्या " झुंड" च्या सेटवर सतत दहा दिवस. तेंव्हाही मी एक फोटो काढला होता त्या सोबत पण नंतर मी तो कधी पाहायलाच नाही कारण त्यातही मला फक्त तोच दिसत होता.


" अमिताभ बोल्तो का रे सेटवर ?"


"कॅाम्प्लेक्स येतो का रे त्याचा ?"


"समोरच्याला घाबरवत असेल ना तो ?"


"काय बोल्लास त्याच्या बरोबर “


असे अनेक प्रश्न कुणी कुणी विचारतात.. आणि त्यांना काय उत्तर द्यावं कळत नाही. जिथे त्या माणसा सोबत एकाच फ्रेममध्ये असून मीच माझ्यासाठी इनव्हीजिबल होतो त्या माणसा बद्दल असल्या प्रश्नांना उत्तरं देत बसणं मला फिजूल वाटतं. नागराज मुळे मला या महान माणसा सोबत काम करता आलं हे नागराजचे उपकारच.


काल “झुंड” पाहिला आणि हा माणुस किती ग्रेट ॲक्टर आहे हे पुन्हा एकदा कळलं. आपलं सगळं स्टारडम, अँग्री मॅनची प्रतिमा आणि लोकांनी दिलेलं देवत्व विसरून एका साध्या फुटबॅाल प्रशिक्षकाची भूमिका ज्या ग्रेसफुली हा माणूस करतो त्याला तोड नाही. नागराज सारख्या तीनेक चित्रपटांचा अनुभव असल्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा निर्णय हा माणुस घेतो तेंव्हा नागराजमधलं इनबॅार्न टॅलेंन्ट कळण्याची क्षमता वर्षानुवर्षांचा अनुभव असल्या माणसालाच असू शकते हे आपल्याला कळतं.


नागराजचा “ झुंड “ प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देऊ शकतो. एकीकडे अमिताभ सारखा अनुभवी नट तर दुसरीकडे नागपूर परिसरातल्या झोपडपट्टी आणि फुटपाथवरली दहाबारा पोरं हे कॅाम्बिनेशन नागराजने “ फॅंन्ड्री , सैराट, नाळ “ नंतर पुन्हा एकदा यशस्वी करून दाखवलं आहे. अगदी नव्या कोऱ्या आणि रॉ लोकांना घेऊन त्यांच्याकडुन अगदी नैसर्गिक कामं करून घेण्याची कळ नागराजला सापडलीय...त्या साताठ पोरांचं काम बघून नट म्हणून हताश वाटतं .. इतकं नैसर्गिक दर वेळी आपल्यालाही करता आलं पाहिजे असं वाटत राहतं. या चित्रपटाचं संगीत आणि गाणी हाही प्रचंड विषय होऊ शकतो. अजय-अतुलना सलाम.


या चित्रपटाचा एकूण परिघ आणि नागराज स्टाईल मध्ये त्याची गोष्ट सांगण्याची हातोटी हे गणित आता जमून आलंय असं दिसतं. नागराजच्या गोष्टी सोबत भोवतालचा समाज, त्यातले प्रश्न, राजकारण हे त्याला लगडूनच येतं.. चित्रपट संपल्यावर एक आशा प्रत्येकाच्या मनांत उमलून येते. सरळ सरळ उपदेशाचे डोस न पाजता प्रेक्षकांसोबत चित्रपटातली पात्र आणि चित्रपट घरपर्यंत येतो.. विचार आपसुकच सुरू होतो… एक भान आल्यागत वाटतं..


या चित्रपटाचा एक छोटासा का होइना पण भाग होता आलं याचा आनंद आहेच, पण जे काही आहे ते काम अमिताभ बच्चन या ऑरासोबत हॅलो करता आलं ही एक अविस्मरणीय बाब आयुष्यात जपून ठेवता येईल या बद्दल नागराज आणि संपूर्ण “आटपाट“ टीमचा मी खूप खूप आभारी आहे’.


 



हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha