Jai Jai Swami Samarth: कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Samarth) ही मालिका सध्या अत्यंत रंजक आणि दैवी वळणावर आली आहे. भक्ती आणि शक्ती यांच्यातील संघर्षात आता एक असा चमत्कार घडणार आहे, ज्याची कल्पनाही प्रेक्षकांनी केली नसेल. स्वामींनी दिलेल्या "अशक्यही शक्य करतील स्वामी" या वचनाची प्रचिती आता हरिप्रिया आणि सावळ्याच्या निमित्ताने संपूर्ण अक्कलकोटला येणार आहे. एका बाजूला मार्तंड आणि अधिकाऱ्याचा कुटील डाव, तर दुसऱ्या बाजूला स्वामींची अगाध लीला; या द्वंद्वात आता सत्याचा विजय कसा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

Continues below advertisement

स्वामी उभे करणार अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली साक्षात 'प्रति-पंढरपूर' 

मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की, मार्तंड आणि केशव मिळून हरिप्रियाला अधिकाऱ्याशी लग्न करण्यास भाग पाडतात, पण तसे घडत नसल्यामुळे हरिप्रियाला आव्हान देतात की ती जर पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेऊ शकली, तर तिचे लग्न स्वामी म्हणतील त्या व्यक्तीसोबत करणार. त्यांच्या कुटील खेळीचा भाग म्हणून हरिप्रियाला पंढरपूरला जाण्यापासून रोखण्यासाठी मार्तंड आणि त्याचे साथीदार सर्व मर्यादा ओलांडणार. खोट्या आरोपांखाली तुरुंगवास आणि वाटेत पेरलेली संकटे यामुळे हरिप्रियाचा प्रवास थांबला असे वाटत असतानाच, स्वामी स्वतः मैदानात उतरणार आहेत. "भक्त विठ्ठलापर्यंत पोहोचू शकला नाही, तर विठ्ठलालाच भक्तापाशी यावे लागेल," या उक्तीप्रमाणे स्वामी अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली साक्षात 'प्रति-पंढरपूर' उभे करणार आहेत. मार्तंडाने "हरिप्रियाचे लग्न विठ्ठलाशी लावून दाखवाच" असे जे आव्हान दिले होते, त्याला स्वामी आपल्या खास शैलीत उत्तर देणार आहेत.

प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच

हा विशेष भाग केवळ चमत्कारापुरता मर्यादित नसून, तो अहंकारी मार्तंड आणि कपटी अधिकारी यांच्यासाठी एक मोठा धडा ठरणार आहे. स्वामी आपल्या दिव्य शक्तीने केवळ हरिप्रियाची स्वप्नपूर्तीच करणार नाहीत, तर सावळ्याला त्याचे गमावलेले आयुष्य पुन्हा मिळवून देऊन एक सामाजिक संदेशही देतील. कपट आणि लबाडीने रचलेला लग्नाचा मांडव आता भक्तीच्या सोहळ्यात कसा बदलतो आणि स्वामींच्या एका कृपेने मार्तंडाची सर्व कारस्थाने कशी धुळीला मिळतात, हे पाहणे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असणार आहे.

Continues below advertisement