Majha Katta : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्स अर्थात इफ्फीमध्ये (IFFI) सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शक असे दोन मोठे पुरस्कार मिळवणाऱ्या गोदावरी सिनेमाबद्दलच्या काही खास आठवणी अभिनेता जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शक निखिल महाजन यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमात जागवल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झालेल्या या सिनेमाचा जन्म कसा झाला ते सिनेमा पाहून कशा प्रतिक्रिया मिळाल्या या साऱ्याबद्दल जितेंद्र आणि निखिल यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचा जन्म हा दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणीतून झाला.. अर्थात चित्रपटाचा त्यांच्या जीवनाशी काहीही संबध नसला तरी त्यांच्या आठवणीतून सिनेमाचा जन्म झाल्याचं जितेंद्र आणि निखिल यांनी सांगितलं.


काही महिन्यांपूर्वीच मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाले. दरम्यान निशिकांत यांचे मराठी चित्रपट सृष्टीत अनेक मित्र होते. त्यातीलच एक असणाऱ्या जिंतेद्र जोशीलाही निशिकांत यांच्या निधनाचा मोठा धक्का बसला. ज्यानंतर जितेंद्र त्याचा मित्र आणि दिग्दर्शक निखिल महाजन याच्याशी याबद्दल बोलला. त्याच काळात जिंतेद्रला नदीच्या जीवनाबाबत एक कविताही सूचली. ज्यातून मग निखिल आणि जितेंद्र यांच्या संकल्पनेतून गोदावरी हा सिनेमा तयार करण्यात आला. दिवंगत निशिकांतशी या सिनेमाचा काहीही संबध नसला तरी सिनेमातील मुख्य पात्राचे नाव मात्र निशिकांत ठेवण्यात आले आहे. दरम्यान सिनेमाबाबतच्या अनेक आठवणी जितेंद्र आणि निखिल यांनी सांगितल्या.


प्रेक्षकांना भारावून टाकणारा सिनेमा


सिनेमाबाबत सांगताना जितेंद्रने सिनेमा प्रेक्षकांना किती भावला याबद्दल काही किस्से सांगितले. यावेळी सिनेमा पाहून अभिनेता पुष्कर क्षोत्री, अभिनेती अमृता खानविलकर असे अनेकजण भारावून जाऊन अक्षरश: रडत असल्याचं जितेंद्रने सांगितलं. तर दिग्दर्शक नागराज मंजुळे, सतीश कौशिक यांनीही सिनेमाचं खास कौतुक केल्याचं जितेंद्र म्हणाला. तर अनेक प्रेक्षकांनी सिनेमाचं कौतुक करताना सिनेमा पाहताना आपण स्वत: गोदावरी नदीत उतरल्यासारखं वाटत असल्याचंही सांगितलं. अशा सिनेमाबद्दलच्या अनेक भन्नाट गोष्टी जितेंद्र आणि निखिलने माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना शेअर केल्या.



हे ही वाचा