Gashmeer Mahajani On Ravindra Mahajani : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते  रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी माधवी महाजन (Madhavi Mahajani) यांनी आपले आत्मचरित्र  लिहिले असून त्याचे प्रकाशन झाले आहे. या आत्मचरित्रात रविंद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) याने वडिलांबाबतच्या हृदयद्रावक आठवणी सांगितल्या आहेत. वडील रविंद्र महाजनी यांच्याकडून आईला मारहाण होत असल्याचे त्याने म्हटले. घरी कधी दार बडवलं जायचं, तर कधी आई एवढाच काय तो फरक असल्याचे गश्मीरने म्हटले. 


गश्मीर महाजनीने  आई माधवी महाजनच्या 'चौथा अंक' या  आत्मचरित्रात आपल्या बालपणींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणींना एक दु:खाची, काळजावर घाव घालणाऱ्या घटनेची किनार आहे. गश्मीरने म्हटले की, ''टेनिस प्रॅक्टिस संपवून १० वर्षांचा मी संध्याकाळी घरी परतलो. लिव्हिंग रुममधील टेबलवर माझं चीज सँडविच आणि दुधाचा ग्लास ठेवला होता. कोचावर काळा चष्मा लावून बाबा बसले होते आणि वर बेडरूमकडे जाणाऱ्या जिन्यावर आई उभी होती. मी येण्याआधी त्यांच्यात जे काही सुरू होतं ते मी येताच जणू टाइम प्लीज घेतल्यासारखं थांबलं. कोचावर बाबांशेजारी बसून मी खायला सुरुवात केली तेव्हा आई हळू आवाजात म्हणाली, ‘गशू, पोलिसांना फोन लाव रे’. यानंतर बाबा माझी टेनिस रॅकेट घेऊन तिच्यावर धावून गेले. आई बेडरूमकडे धावली, बेडरूमच्या दारावर रॅकेट बडवण्याचा आवाज घरभर घुमू लागला. घरातील कुत्री भुंकू लागली आणि मी बसल्याजागी भोकाड पसरलं. थोड्यावेळाने बाबा शांत होऊन खाली उतरले, माझी रॅकेट कोचावर ठेवली आणि ‘काही नाही झालं तुझ्या आईला’, असं म्हणत निघून गेले. त्या काळात असे प्रसंग आमच्या घरात वारंवार होत. फक्त कधी दार बडवलं जायचं, तर कधी आई एवढाच काय तो फरक.” असे गश्मीरने म्हटले.  “बालपणीच्या कुठल्या आठवणी आपल्या लक्षात राहाव्यात हे आपल्या हातात नसतं. ते त्या आठवणीच ठरवतात. माणसांच्या स्मरणशक्तीचं हे फार मोठं रहस्य असल्याचेही गश्मीरने म्हटले. 


माझ्या बाबांना प्रत्येक डाव खेळण्याआधी निश्चितपणे माहित होतं...


गश्मीरने आपल्या भूतकाळातील आठवणींबाबत लिहिताना वडील गश्मीर महाजन यांच्या जुगाराच्या सवयी आणि काही गोष्टींचे झालेले परिणाम याचाही उल्लेख केला. गश्मीरने म्हटले की, 
भूतकाळात घेतलेले निर्णय वर्तमानातील आपल्या परिस्थितीस कारणीभूत ठरतात. आता घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा, उचललेल्या प्रत्येक पावलाचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे याची पूर्णपणे कल्पना असते. घेतलेला निर्णय भविष्यासाठी योग्य आहे की नाही हेदेखील आपल्या निश्चितपणे माहित असतं. हातात असलेली मालमत्ता बेफिकिरीने लोकांवर उधळण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आजोबांना (आईच्या बाबांना) माहित होते, बाबांशी लग्न करण्याचे काय परिणाम होती हे माझ्या आईला लग्नाआधीच व्यवस्थित माहित होते. जुगारात एकदा का बिगिनर्स लक संपलं की आपण सगळे पैसे गमावून बसू हे माझ्या बाबांना प्रत्येक डाव खेळण्याआधी निश्चितपणे माहित होतं, असेही  गश्मीरने 'चौथा अंक'मध्ये नमूद केले आहे.