x`मुंबई : क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या त्याच्या मैदानातालील कोणा एका खेळीमुळे नव्हे, तर देशातील शेतकरी आंदोलनाबाबत दिलेल्या त्याच्या प्रतिक्रियेमुळे चर्चेत आला आहे. या चर्चांमध्ये त्याच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्यांची आणि नकारात्मक सूर आळवणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे.


मुख्य म्हणजे यात काही सेलिब्रिटींचाही समावेश झाला आहे. मराठी चित्रपट दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी ट्विट करत सचिननं शेतकरी आंदोलनावर मांडलेल्या मताचा खरपुस समाचार घेतला आहे. पॉप गायिका रिहानासह इतरही आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मंडळींनी भारतातील शेतकरी आंदोलनाची दखल घेत त्याला पाठिंबा दर्शवला. पण, यावरच प्रतिक्रिया देत काही भारतीय सेलिब्रिटींनी मात्र सरकारचीच बाजू घेतली.


नेटकरी मागत आहेत शारापोव्हाची माफी, सचिन आहे यामागचं कारण


सचिन तेंडुलकरनं थेट देशाच्या सार्वभौमत्त्वाचा मुद्दा उचलून धरत ''बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात. मात्र, ते यात सहभागी असू शकत नाही. भारतीयांना हा देश ठाऊक आहे. तेच भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूटीनं उभे राहूया'', अशी प्रतिक्रिया दिली.
सचिनची ही भूमिका अनेकांनाच खटकली. सोशल मीडियावरही त्याच्याविरोधात सूर आळवला गेला. यावरच एक क्रीडारसिक आणि सचिनचा दुखावलेला चाहता म्हणून समीर विद्वांस यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.








'सचिनची बॅटींग बघत लहानाचा मोठा झालो! तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता! आयुष्यात अनेक निराश क्षणी मी त्याच्या इनिंग्ज बघायचो, खूप बरं वाटायचं. त्याच्या अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत पण हे कधी बदललं नव्हतं. पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल. राग येतोचे पण वाईट जास्त वाटतय!', अशा शब्दांत त्यांनी सचिनवर नाराजी व्यक्त केली. सरकारची बाजू तुम्हाला पटते, पण आपल्याच शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सुरु असणारी कृत्य तुम्हाला पटतात का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सोशल मीडियावर विद्वांस आणि त्यांच्याप्रमाणंच इतरांच्याही अशाच प्रतिक्रियांना सध्या प्रचंड उधाण आलेलं दिसत आहे.