मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या पार्थिवावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिचं पार्थिव तिरंग्यात गुंडाळण्यात आलं होतं. श्रीदेवीच्या पार्थिवाला मुंबई पोलिसांनी गार्ड ऑफ ऑनरही दिला. पण श्रीदेवीचं पार्थिव तिरंग्यात का? असा प्रश्न सोशल मीडियातून अनेक जण विचारु लागले.


सोशल मीडियावर हा प्रश्न बराच व्हायरल होत असल्याने एबीपी माझाने याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही एक्सपर्टने सांगितलं की, पूर्वी फक्त घटनात्मक पदावरील व्यक्ती, माजी पंतप्रधान आणि माजी राष्ट्रपती यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत होते. पण त्यानंतर यासंबंधिच्या नियमात बदल करण्यात आले. त्यामुळे नव्या नियमानुसार आता राज्य सरकारला यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानंतर राजकीय, साहित्य, कायदा, विज्ञान आणि कला क्षेत्रात योगदान देणाऱ्या लोकांना हा राजकीय सन्मान देण्यात येऊ लागला.

श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का?

श्रीदेवी हे चित्रपट क्षेत्रातील मोठं नाव होतं. तिने तमिळ, तेलगु, हिंदी, मल्याळम आणि कन्नड सिनेमांमध्येही काम केलं आहे. तसंच ती बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टारही होती. 2013 साली मनोरंजन क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने तिला 'पद्मश्री'ने सन्मानित केलं होतं. श्रीदेवीच्या मृत्यूच्या बातमीनंतर महाराष्ट्र सरकारने श्रीदेवीला राजकीय सन्मान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच तिचं पार्थिव शरीर तिरंग्यात गुंडाळून तिला गार्ड ऑफ ऑनर देण्यातआला.