TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


कार्तिकच्या भूल भूलैय्या-2 ची बॉक्स ऑफिसवर जादू; तीन दिवसांमध्ये कोट्यवधींची कमाई


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्याच्या या चित्रपटाचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. 20 मे रोजी भूल भूलैय्या-2 हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं वीकेंडला जबरदस्त कमाई केली आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 14.11 कोटींची कमाई केली. आता विकेंडलादेखील या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.


'लग्न झाल्यानंतर बायकांचं वजन वाढतं, पिझ्झा सोडा भाकरी खा'; अशा भोसलेंनी दिल्या फिटनेस टिप्स


प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा चाहता वर्ग मोठा आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये आशा यांनी त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. तसेच 'पिझ्झा खाणं सोडा आणि भाकरी खा', असंही आशा भोसले यांनी सांगितलं. 


शैलेश लोढा यांच्यानंतर आता मुनमुन दत्ता देखील सोडणार 'तारक मेहता' मालिका? चर्चेला उधाण


तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो सध्या त्यामधील कलाकारांमुळे चर्चेत आहे. गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेमधील कलाकारांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. पण काही दिवसांपूर्वी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमधील अभिनेते शैलेश लोढा  यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा सुरू होती. आता लवकरच मुनमुन दत्तादेखील ही मालिका सोडणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. 


प्रवाह पिक्चर वाहिनीचा उपक्रम; भिंतीचित्राच्या माध्यमातून मुंबईतल्या तुलसी पाईप मार्गाचं पालटलं रुप


दर्जेदार मराठी चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन आलेल्या ‘प्रवाह पिक्चर’ या वाहिनीने नुकताच एक स्तुत्य उपक्रम राबवला. या अनोख्या उपक्रमा अंतर्गत मुंबईतील तुलसी पाईप मार्गाजवळ मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या सिनेमांचं भव्यदिव्य भिंतीचित्र साकारण्यात आलं. गेला महिनाभर अनेक चित्रकारांचा ताफा या निस्तेज भिंतीमध्ये जीव ओतण्यासाठी मेहनत घेत आहे. मराठी कलाकारांची हुबेहुब चित्र साकारत या चित्रकारांनी तुलसी पाईप मार्गाचं रुप पालटलं आहे. ही बोलकी भिंतीचित्र सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव, अंकुश चौधरी आणि प्रतिभावंत दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या खास उपस्थितीत ह्या भव्यदिव्य भिंतीचित्रांचं अनावरण करण्यात आलं. याप्रसंगी ही अनोखी भिंतीचित्र रेखाटणाऱ्या चित्रकारांचा सन्मान करण्यात आला.


'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर येणार सेलिब्रिटी कपल


'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला  पसंती मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर या आठवड्यात प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमध्ये अनेक कलाकारांची देखील लग्न झाली. तर काही कलाकारांचा साखरपुडादेखील झाला. या सगळ्यात चर्चेत होते ते म्हणजे विराजास कुलकर्णी आणि शिवानी रंगोळे आणि प्रेक्षकांचा लाडका राणादा आणि पाठक बाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर.


'सफेद' सिनेमाचा फर्स्ट लूक समोर


 जगभरातील अनेक दिग्गज 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला हजेरी लावत आहेत. संदीप सिंह दिग्दर्शित 'सफेद' सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये करण्यात आले आहे. 'सफेद' सिनेमाचा फर्स्ट लूक ए. आर. रहमान यांनी लॉंच केला आहे. 


आदित्य नारायणने लाडक्या लेकीची पहिली झलक केली शेअर


आदित्य नारायणने लाडक्या लेकीचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 'त्विषा' असे आदित्य नारायणच्या मुलीचे नाव आहे. 'त्विषा' तीन महिन्यांची झाल्यानंतर आदित्यने त्याच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. आदित्य त्याच्या लाडक्या लेकीचे लाड पुरवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. 


'आठवा रंग प्रेमाचा' सिनेमाचा टीझर आऊट


चिरंतन राहणाऱ्या प्रेमावर भाष्य करणारा 'आठवा रंग प्रेमाचा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि विशाल आनंद ही फ्रेश जोडी या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


'चंद्रमुखी' फेम अमृता खानविलकरने घेतले ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन


मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर अनेक मराठी-हिंदी सिनेमे, मालिका आणि वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या अमृता 'चंद्रमुखी' सिनेमामुळे चर्चेत आली आहे. या सिनेमाने चांगली कमाई केल्याने अमृताने अक्कलकोटमधील ‘श्री स्वामी समर्थ’ आणि तुळजापूरमधील ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन घेतले आहे. 


अभिषेक बच्चनवर कोसळला दु:खाचा डोंगर


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चननं आराध्या बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. आता हे सर्वजण भारतामध्ये परत आले आहेत. पण भारतामध्ये परत आल्यावर अभिषेकवर दु:खाचा डोंगर कोसळला. अमिताभ बच्चन यांचे  कॉस्ट्यूम डिझायनर अकबर शाहपुरवाला यांचे निधन झाले आहे. अभिषेकनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करुन अकबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.