मुंबई: बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांचा बहुचर्चित चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' आज रिलीज झाला आहे. मात्र चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षक आणि समीक्षकांचे रिव्ह्यू निराशाजनक येत आहेत. तब्बल 240 कोटी खर्च करुन तयार केलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत नाही.


मागील काही वर्षांमध्ये पहिल्यांदाच आमिरच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली आहे. सोशल मीडियातून चित्रपट वाईट असल्याच्या पोस्टही शेअर होत आहेत.

चित्रपट ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्शने 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाला 2 स्टार देत हा चित्रपट निराशा करणारा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, "नेहमी चमकणारी वस्तू सोनं नसते. पहिल्या भागात काही मनोरजंक मूमेंट्स आहेत. बस्स इतकंच. बाकी पटकथा, कमजोर दिग्दर्शन हे या चित्रपटाच्या अपयशाचे कारण आहे."

'ठग्सला' सुट्टींचा कालावधी, चित्रपटाबद्दल निर्माण झालेले सकारात्मक वातावरण, तगडी स्टारकास्ट या सर्वांचा फायदा होऊ शकतो. मात्र आमिरच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर टिकून राहणे अवघड जाणार आहे, ठग्सने एक मोठी संधी गमावली असल्याचे तरण आदर्शने आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले आहे.

वादग्रस्त चित्रपट समीक्षक कमाल खानने 'ठग्सला' कंटाळवाणा आणि  जुनाट कथानक असल्याचे म्हटले आहे.