मुंबई : अभिनेते नाना पाटेकरांवर गंभीर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती, ती मिळाली नाही म्हणून ते तोडफोड करतात, असं ती म्हणाली.


''नालायक माणूस जेव्हा स्वतःला लायक ठरवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो तोडफोडच करतो,'' असा आरोप मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत तनुश्री दत्ताने केला. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच मनसे कार्यकर्त्यांनी माझी कार फोडली असा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. यावेळी तिने थेट राज ठाकरेंवरच आरोप केले आहेत.

तनुश्री दत्ताने काही दिवसांपूर्वी नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचा आरोप केला होता. हा आरोप केल्यापासून तनुश्री दत्ता चर्चेत आहे.

''बॉलिवूडमध्ये होणाऱ्या गोष्टींवर कुणी बोलत नाही. मी अमेरिकेत राहते, तेथील ग्रीन कार्ड माझ्याकडे आहे, मी तिथली रहिवासी आहे. सध्या सुट्टीसाठी आली आहे, सुट्टी संपली की जाईन. पण इथे कुणी तरी बोलायला हवं,'' असं तनुश्री म्हणाली.

''मुंबईत तोडफोड कोण करतं? मनसेकडून तोडफोड केली जाते, राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची पाहिजे होती, ती मिळाली नाही म्हणून ते स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. नालायक स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हेच होतं. त्यांनी स्वतःसारख्याच लोकांना पक्षात घेतलंय आणि तोडफोड केली जाते,'' अशा शब्दात तनुश्रीने आरोप केला.

काय म्हणाली तनुश्री दत्ता?