मुंबई : दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह यांनी मुंबईत 1 डिसेंबरला लग्नाची रिसेप्शन पार्टी ठेवली होती. यामध्ये सिनेसृष्टीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांनी होणाऱ्या सुना आणि संपूर्ण कुटुंबासह पार्टीला हजेरी लावली. पण यावेळी त्यांना बुचकळ्यात टाकणारा प्रसंग घडला.


अंबानी कुटुंब दीपवीरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये फोटोग्राफर्सना पोझ देत होते. यावेळी एका फोटोग्राफरने मुकेश अंबानींकडे जिओच्या नेटवर्कची तक्रार केली. त्याने ओरडून सांगितलं की, 'सर, जिओ चालत नाही'. हे ऐकून तिथे उपस्थित फोटोग्राफर्स हसू लागले. तर इशा अंबानी तसंच होणाऱ्या सुना श्लोका आणि राधिका यांनी मुकेश अंबानीकडे पाहिलं.

भर कार्यक्रमात हा प्रकार घडल्याने आता नेमकं करायचं तरी काय, असा प्रश्न मुकेश अंबानींना पडला. फोटोग्राफरने जिओची तक्रार केल्याने अंबानींना नेमकं काय बोलावं तेच कळलं नाही. त्यांच्या चेहऱ्यावरुन तसं अगदी स्पष्ट दिसत होतं. मात्र चेहऱ्यावर हास्य कायम होतं.


संपूर्ण कुटुंब आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवून कॅमेऱ्यासाठी पोझ देत होतं. तेवढ्यात तिथे संजय दत्त आला. त्याला पाहताच मुकेश अंबानी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना फोटोग्राफरच्या तक्रारीपासून कशीबशी आपली सुटका करुन घेतली. मगल संजयने संपूर्ण अंबानी कुटुंबाची भेट घेतली.

यानंतर फोटोग्राफर्सनी मुकेश अंबानी आणि संजय दत्त यांच्याकडे एकत्र फोटोची मागणी केली. पण अंबानी कुटुंब हसतच तिथून निघून गेलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर लोक कमेंट्स करत आहेत.

रिलायन्स जिओ ही भारताची मोबाईल टेलीफोन, ब्रॉडबॅण्ड आणि डिजिटल सेवा देणारी कंपनी आहे.रिलायन्स इंडस्ट्रीची ही सब्सिडरी कंपनी आहे. मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर त्यांचे मोठे पुत्र आकाश अंबानी हे जिओचे चीफ ऑफ स्ट्रॅटेजी आहे.