सगळे खान गप्प का? कुलभूषण जाधव प्रकरणी गायक अभिजीतचं ट्विट
एबीपी माझा वेब टीम | 11 Apr 2017 07:47 AM (IST)
मुंबई : प्रसिद्ध हिंदी गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी कुलभूषण जाधव प्रकरणी ट्विट करुन, "सगळे खान गप्प का आहेत?" अशी विचारणा केली आहे. भारतात पाकिस्तानी नागरिक दिसल्यास त्यांना झाडाला लटकवा, असंही त्यांनी म्हटलं आहे. रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्याविरोधात आवाज उठवत अभिजीत यांनी हे ट्विट केलं आहे. https://twitter.com/abhijeetsinger/status/851467055933132801 अभिजीत भट्टाचार्य यांनी बॉलिवूडमधील 'खान' कॅम्पवर निशाणा साधला. "भारतात पाकिस्तानी दिसल्यास झाडाला लटकवलं पाहिजे. पाकिस्तानी तुम्हाला प्रामुख्यानं बॉलिवूड, महेश भट्ट, किंवा करण जोहर यांच्या घरात सापडतील." असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ट्विटरवरुन अभिजीत यांनी पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात काम देणाऱ्या सिनेदिग्दर्शकांवरही निशाणा साधला आहे. https://twitter.com/abhijeetsinger/status/851470106509049856 अभिजीत यांनी आपल्या या ट्विटनंतर "सारे खान चूप क्यू हो?" असं आणखी एक ट्विट केलं आहे. काय आहे प्रकरण? ‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानी मीडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. रावळपिंडी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. कुलभूषण जाधव यांचं 2016 मध्ये इराणमधून अपहरण करण्यात आलं होतं. मात्र ते पाकिस्तानमध्ये कसे सापडले याचं उत्तर अजूनही पाकिस्तानने दिलेलं नाही. आंतरराष्ट्रीय कायद्याने याची माहिती घेण्याचा अधिकार भारताला दिलेला आहे. भारताने 25 मार्च 2016 ते 31 मार्च 2016 या काळात 13 वेळा पाकिस्तानच्या उच्च आयोगाला कुलभूषण जाधव यांच्याविषयी माहिती मागितली. पण पाकिस्तानने त्याला प्रतिसाद दिला नाही. कोणत्याही वैध पुराव्याशिवाय कुलभूषण जाधव यांना फाशी देणं हास्यास्पद आहे. त्यांच्यावर खटला चालवला जातोय, याची माहिती देखील आतापर्यंत भारताला देण्यात आली नव्हती, अशा तीव्र शब्दात भारताने पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत. हेरगिरी प्रकरणी पाकिस्तानात अटक केलेला भारतीय तरुण कुलभूषण जाधव विरोधात ठोस पुरावे नसल्याची कबुली पाकिस्तानने स्वतः दिली आहे. जाधवविरोधात कुठलेही निर्णायक पुरावे नसल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण सरताज अजीझ यांनी स्पष्ट केलं होतं. मार्च महिन्यात बलुचिस्तानातून कुलभूषण जाधव यांना रॉ एजंट असल्याच्या आरोपातून पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. भारतीय हेर कुलभूषण जाधवबाबत असलेल्या कागदपत्रांमध्ये निव्वळ काही विधानं आहेत, कोणतेही पुरावे नाही, असं अजीझ यांनी पाकिस्तानच्या सिनेटमध्ये सांगितलं होतं. कुलभूषण जाधव यांना कायद्याची पायमल्ली करुन फाशी देण्यात आली, तर ही पूर्वनियोजित हत्या समजली जाईल, असा स्पष्ट इशारा भारताने पाकिस्तान उच्च आयोगाला दिला आहे. कथित कबुलीनाम्याचा व्हिडीओ यापूर्वी पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांच्या कथित कबुलीनाम्याचा व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओत कुलभूषण जाधव यांनी आपण रॉ एजंट असल्याचं मान्य केल्याचा दावा, पाकिस्तानने केला होता. मात्र भारताने या व्हिडीओच्या सत्यतेवर आक्षेप घेतला होता. कोण आहेत कुलभूषण जाधव ? जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत. कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात अटक झाली आहे. जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो.’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती. संबंधित बातम्या: … तर आम्ही ही पूर्वनियोजित हत्या समजू, भारताने पाकला खडसावलं कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा