मुंबई : दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी अभिनेता आमीर खानने महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानाशी हातमिळवणी केली. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक गावं दुष्काळमुक्त झाली. या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचं बिगुल उद्या वाजणार असून महाराष्ट्रातील 30 तालुके यात सहभागी होणार आहेत.


मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव या स्पर्धेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी एक म्युझिक व्हिडिओ तयार करणार आहेत. किरण या व्हिडिओतून पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे किरण राव मराठी भाषेत गाणं गाणार आहे. गुरु ठाकूरने हे गाणं लिहिलं असून अजय-अतुलने संगीतबद्ध केलं आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे या म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन करणार असून 'सैराट' फेम आर्ची-परशा अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर या व्हिडिओत झळकणार आहेत. या दोघांसोबत खुद्द आमीर खानही दिसणार आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या पहिल्या पर्वात साताऱ्यातील वेळू हे गाव अव्वल आलं होतं.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचा कालावधी 8 एप्रिल 2016 ते 22 मे 2016 हा असेल. यामध्ये सहभागी होणाऱ्या गावांची नावं तीन जानेवारी रोजी संध्याकाळी जाहीर केली जातील. तीन गावांची निवड केली जाणार असून प्रथम क्रमांकाच्या गावाला 50 लाख, द्वितीय क्रमांकाच्या गावाला 30 लाख, तर तृतीय क्रमांकाच्या गावाला 20 लाखांचं रोख पारितोषिक मिळेल.

संबंधित बातम्या :


सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत साताऱ्यातील वेळू अव्वल