भन्साळी मुंबईला परतणार, 'पद्मावती'चं शूटिंग रद्द
एबीपी माझा वेब टीम | 28 Jan 2017 02:31 PM (IST)
जयपूर : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना राजस्थानातील जयपूरमध्ये मारहाण झाल्यानंतर, बॉलीवूडकरांनी ट्विटरवर आपला राग व्यक्त केला. चित्रपटाच्या कथेला आक्षेप घेत राजपूत समाजाशी संबंधित करणी सेनेने भन्साळींवर हल्ला केला. या मारहाणीनंतर अनेक दिग्दर्शकांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनी संजय लीला भन्साळी यांचं समर्थन केलं. भन्साळींनी मात्र 'पद्मावती'चं शूटिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला असून ते संपूर्ण क्रू मेंबरसह मुंबईला परतणार आहेत. शिवाय राजस्थानमध्ये पुन्हा कधीही शूटिंग न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सेलिब्रिटींकडून हल्ल्याचा निषेध अभिनेत्री प्रियांका चोप्रा, राम गोपाल वर्मा, करण जोहर, श्रेया घोषाल, रितेश देशमुख, हृतिक रोशन यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी संजय लीला भन्साळी यांच्यावरील हल्ल्याचा ट्विटरवरुन निषेध केला आहे. 'पद्मावती'च्या सेटची तोडफोड जयगड किल्ल्यात भन्साळी यांच्या सिनेमाचं शूटिंग सुरु असतानाच करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे येऊन निषेध केला. त्यांनी सेटवरील सामानाचीही तोडफोड केली. तसंच संजय भन्साळी यांच्या थोबाडात मारली. दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.