Rakhi Sawant Sameer Wankhede :  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी अभिनेत्री आणि  'बिग बॉस 14' ची स्पर्धक राखी सावंत (Rakhi Sawant) आणि तिचे वकील अली काशिफ खान यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. वानखेडे यांनी 11 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. मुंबईतील (Mumbai) गोरेगाव (Goregaon) येथील दिंडोशी शहर दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे. राखी सावंत आणि तिच्या वकिलांनी आपली प्रतिमा डागाळण्याचा आणि बदनामीचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. 


राखी सावंतच्या वकिलांनी काय म्हटले?


ईटी टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या  मानहानीच्या खटल्याबाबत राखी सावंतचे वकील अॅड. अली काशिफ खान म्हणाले, 'कायद्याचा अर्थ असा आहे की, जनतेच्या भल्यासाठी सत्य बोलल्यास बदनामी होत नाही. आयपीसीच्या कलम 499 मधील दुसरा अपवाद म्हणजे 'पब्लिक कंडक्ट ऑफ पब्लिक सर्व्हंट्स', म्हणजेच एखाद्या सार्वजनिक सेवकाच्या सार्वजनिक कार्यात त्याच्या वागणुकीबद्दल किंवा चारित्र्याबद्दल सद्भावनेने मत मांडले गेले तर त्याची बदनामी होत नाही असे अॅड. खान यांनी सांगितले. अॅड. खान हे मॉडेल मुनमुन धमेचा हिचाही वकील आहे. मुनमुनला 2021 मध्ये ड्रग्ज छापेमारी प्रकरणात अटक करण्यात आली होती. या छापेमारीचे नेतृत्व समीर वानखेडे यांनी केले होते. 


समीर वानखेडे यांना उत्तर देणार


अॅड. अली काशिफ खान यांनी सांगितले की, समीर वानखेडे यांनी आपल्याविरोधातील खटला योग्य असल्याचे सिद्ध केल्यास मी त्यांना 11.01 लाख रुपये देईल. सध्या हे प्रकरण न्यायालयासमोर असल्याने कोणतीही अधिक प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. राखी सावंतने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 


राखी सावंतने काय म्हटले?






शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली तेव्हा राखी सावंतने आर्यन खानला पाठिंबा दिला होता. तिने अनेक व्हिडिओ शेअर करून आर्यन खान हा निर्दोष असल्याचे म्हटले. राखी सावंत आपल्या बेधडक वक्तव्य आणि ड्रामाबाजीमुळे चर्चेत असते. त्यातून अनेकदा ती ट्रोलदेखील झाली आहे. तर, काहींनी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.