मुंबई : रिओ ऑलिम्पिकसाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून सलमान खानप्रमाणेच सचिन तेंडुलकर आणि संगीतकार ए. आर. रहमान यांचंही नाव जाहीर झालं तेव्हा सोशल मीडिया किंवा अन्य प्रसारमाध्यमे गप्प का राहिली असा सवाल सलमान खानने केला आहे.


 
रिओ ऑलिम्पिकचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नाव जाहीर झाल्यावर सोशल मीडियातून सलमान खानवर मोठी टीका झाली. सोशल मीडियातील ही टीका पुढे मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांमध्येही दिसली. एक बॉलीवूड अभिनेता क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या इव्हेंटचा ब्रँड अॅम्बेसिडर कसा होईल, असा प्रश्न सर्वांना पडला, तोच प्रश्न सचिन तेंडुलकर किंवा ए. आर. रहमान यांच्याबाबतीत पडला नाही.

 

 

काय आहे वाद ?



रिओ ऑलिम्पिकमध्ये सचिन, रहमान भारताचे गुडविल अॅम्बेसेडर


 
सलमान खानची रिओ ऑलिम्पिकसाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती झाल्यावर मिल्खा सिंह आणि योगेश्वर दत्त यासारख्या खेळाडूंनी त्यांची नाराजी जाहीरपणे नोंदवली होती. त्यानंतर सोशल मीडियातून योगेश्वर दत्त आणि मिल्खा सिंह यांना मोठं पाठबळ मिळालं. सोशल मीडियातून सलमानला ब्रँड अॅम्बेसिडर नेमण्याच्या निर्णयावर टीका झाल्यानंतर आयएओ म्हणजे भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं वातावरण निवळण्यासाठी सचिन तेंडुलकर, अभिनव बिंद्रा आणि संगीतकार एआर रहमान यांचीही ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करणार असल्याचं जाहीर केलं.

 


नेमबाज अभिनव बिंद्राही भारतीय ऑलिम्पिकचा सदिच्छादूत


 
सलमान सोबत अन्य तिघे जण रिओ ऑलिम्पिकचे ब्रँड अॅम्बेसिडर बनल्यानंतर सोशल मीडियाने त्याचं स्वागत केलं. त्यामुळे सोशल मीडिया आणि त्याच्या कौलावरून बातम्या करणाऱ्या मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांवर सलमान खानने बोट ठेवलंय. विरोध करायचा तर सर्वांनाच व्हायला हवा होता, तो फक्त सलमान खानला का झाला, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला.


 

संगीतकार ए. आर. रहमानला विरोध का नाही?


 
सचिन तेंडुलकर आणि अभिनव बिंद्रा हे खेळाडू आहेत हा बचाव मान्य केला तरी ए.आर. रहमान हे खेळाडू नाहीत, मग त्यांच्याविषयी सोशल मीडियातून कोणतीही प्रतिक्रिया का उमटली नाही.


 

गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता :


 
आपल्यावर बेदरकारपणे गाडी चालवल्याचा गुन्हा असला तरी उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलीय, याकडेही त्याने लक्ष वेधलं. हा खटला अजून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तिथे अजून निर्णय आलेला नाही. केवळ आरोप असल्याच्या कारणावरून सलमान खानला विरोध होत असेल तर आज देशातील अनेक नेत्यांवर आणि राजकारण्यांवरही वेगवेगळ्या घोटाळ्याचे आरोप आहेत, फक्त आरोप आहेत म्हणून ते पद आणि त्यापासून मिळणारे फायदे सोडून देतात का? असा सवालही सलमान खानने उपस्थित केला.

 
देश मोठा की ऑलिम्पिक, असा प्रश्न उपस्थित करून सलमान खानने त्याच्यासाठी देश मोठा असल्याचं स्पष्ट केलंय. देशाचा कारभार हाकण्याची जबाबदारी असलेल्या नेत्यांनी भ्रष्टाचार घोटाळे केले तरी चालतं मात्र आपल्याला फक्त ऑलिम्पिकचं ब्रँड अॅम्बेसिडरही होऊ दिलं जात नाही, हा दुजाभाव कशासाठी अशी खंतही त्याने व्यक्त केली.


 

संबंधित बातम्या :


 

ऑलिम्पिक अॅम्बेसेडर वाद : सलमानच्या बचावासाठी सलीम खान मैदानात


रिओ ऑलिम्पिकचा सदिच्छादूत सलमानवर योगेश्वर दत्तचे ताशेरे


रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना ‘सुलतान’ची साथ!