मुंबई: आयुष्यात यश आणि अपयश येतंच पण त्यामुळे खचण्याचं कारण नाही. कारण आयुष्यात स्वत:ला सिध्द करण्याची संधी दुसऱ्यांदा मिळते. पण आयुष्य दुसऱ्यांदा मिळत नाही.


 

होय... कारण की, दापोलीतील एका विद्यार्थिनीनं अवघ्या 5 टक्क्यांसाठी आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. आयुष्य संपवणं हे कोणत्याही अडचणीवरील उत्तर होऊ शकत नाही.

 

गेले काही दिवस 'सैराट' सिनेमाची बरीच चर्चा आहे. पण या सिनेमात आपल्या सक्षम अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करुन जाणारी अभिनेत्री देखील 12वीच्या परीक्षेत नापास झाली होती. खेळाची आवड त्यातही कब्बडीमध्ये राज्यपातळीवर मैदान गाजवणाऱ्या छाया कदम यांना देखील 12वीत अपयशाला सामोर जावं लागलं होतं. पण या अपयशानं त्या कधीही खचून गेल्या नाहीत. तर त्यावर मात करत आयुष्यात पुन्हा नव्यानं काही तरी करण्यास सज्ज झाल्या.

 

अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन याबाबतची माहिती दिली आहे. 12वीत नापास झाले म्हणून मी कधी टोकाचं पाऊल उचललं नाही. असं म्हणत त्यांनी आपला अनुभव शेअर केला आहे.