मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाने 19 वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं होतं. संजय लीला भन्साळींच्या या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल येण्याची चिन्हं आहेत. भन्साळींनी सलमान या रोमँटिक चित्रपटात असल्याचं निश्चित केलं आहे. विशेष म्हणजे सलमानसोबत ऐश्वर्याला सिनेमात कास्ट करण्याचा भन्साळींचा इरादा आहे.


सलमान खान आणि ऐश्वर्या यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. ब्रेकअपनंतर दोघांनी एकत्र चित्रपट करणंच काय, एकमेकांसमोर येणंही टाळलं आहे. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर सर्व वाद मिटवून सलमान-ऐश्वर्या एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र भन्साळींनी ऐश्वर्याची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

कतरिना कैफ ही सलमानची लाडकी अभिनेत्री. एक था टायगर, टायगर जिंदा है यासारख्या चित्रपटांच्या यशानंतर कतरिनासोबत पुन्हा जोडी जुळवण्यासाठी सलमान उत्सुक आहे. तर बाजीराव मस्तानी, पद्मावतनंतर भन्साळींच्या मनात दीपिकाचं नावही घोळत होतं.

सुरुवातीला, अनुष्का शर्माचं नाव चर्चेत होतं. अगदी आलिया भट आणि जान्हवी कपूर यांचीही नावं स्पर्धेत होती. मात्र दोघीही सलमानच्या मुलीच्या वयाच्या असल्यामुळे त्यांची जोडी हिट होणार नाही, असा भन्साळींचा अंदाज आहे.

सलमानच्या 'दबंग 3'चं शूटिंग संपल्यावर म्हणजेच सप्टेंबरनंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरु होणार असल्याची माहिती आहे. सिनेमाची निर्मिती सलमान आणि भन्साळी संयुक्तपणे करणार आहेत.