मुंबई: सलमाननं शहिदांचा अपमान केल्यानंतरही मनसेनं दिलेल्या थंड प्रतिक्रियेमुळे आता बरीच चर्चा सुरु झाली आहे.


पाकिस्तानी कलाकारांना धडा शिकवण्याची भाषा करणाऱ्या मनसेनं त्यांची वकिली करणाऱ्या सलमानचा केवळ निषेध करुन विषय संपवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

'आमच्या अल्टिमेटमनंतर सगळे पाकिस्तानी कलाकार भारत सोडून निघून गेले आहेत. त्यामुळे सलमानकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची गरज नव्हती. आम्ही त्याच्या वक्तव्याचा निषेध करतो. ते माझे चांगले मित्र आहेत. पण मैत्री वेगळी आणि आमची भूमिका वेगळी आहे. आम्ही त्याच्या वक्तव्याचा निषेध करतो पण विरोध प्रदर्शन करणार नाही.' असं वक्तव्य मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलं आहे.

उरी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांबद्दल चीड निर्माण झाली आहे. त्यातच भारताच्या सर्जिकल स्ट्राईकने देशात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड राग आहे. मात्र अभिनेता सलमान खानला पाकिस्तानी कलाकारांचा खूपच पुळका असल्याचं दिसतंय. कारण पाकिस्तानी कलाकार हे दहशतवादी नाहीत, असं सलमान खानने म्हटलं आहे.

मनसे नेत्यांची सलमानशी असलेली जवळीक याला कारणीभूत असल्याची चर्चा आहे. कारण मनसेनं पाक कलाकारांची भूमिका असलेल्या रईस आणि ए दिल है मुश्कीलचं रिलीज रोखण्याची धमकी दिली. इतकंच नव्हे तर करण जोहर आणि शाहरुखच्या घराबाहेर निदर्शनंही केली. मात्र त्याचवेळी सलमाननं पाकची वकिली केल्यानंतरही आंदोलनाचं काय करायचं ते बघू असं मनसेनं म्हटलं आहे.