नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांबद्दल चीड निर्माण झाली आहे. त्यातच भारताच्या सर्जिकल स्ट्राईकने देशात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड राग आहे. मात्र अभिनेता सलमान खानला पाकिस्तानी कलाकारांचा खूपच पुळका असल्याचं दिसतंय. कारण पाकिस्तानी कलाकार हे दहशतवादी नाहीत, असं सलमान खानने म्हटलं आहे.
भारताने केलेलं सर्जिकल स्ट्राईक योग्य आहे, मात्र पाकिस्तानमधून आलेले कलाकार हे काही दहशतवादी नाहीत. ते सर्व प्रक्रिया पूर्ण करुनच भारतात प्रवेश करतात, असं सलमान खान म्हणाला.
यापूर्वी मनसेने पाकिस्तानी कलाकारांना मुंबई सोडण्याचा इशारा दिला होता. तसंच पाकिस्तानी अभिनेता फवाद खान असलेला ऐ दिल है मुश्किल आणि माहिरा खानच्या रईस सिनेमाला मनसेने विरोध केला.
मात्र दुसरीकडे सलमान खानने फवाद खान आणि पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेतली होती. त्याचाच भाग म्हणून करण जोहरच्या ‘ए दिल है मुश्किल’ हा सिनेमा कोणताही अडथळा न येता प्रदर्शित होण्यासाठी, सलमान खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला होता.
सलमान आणि राज ठाकरे यांच्यात मैत्रीचे संबंध असल्यामुळे त्याने राज यांना फोन करून ‘ए दिल है मुश्किल’ आणि ‘रईस’ हे दोन्ही चित्रपट अडथळ्याविना प्रदर्शित होऊ द्यावे, अशी विनंती केली होती.