करण जोहरच्या बचावासाठी सलमानचा राज ठाकरेंना फोन
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2016 12:42 PM (IST)
मुंबईः मनसेने पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडण्याचा अल्टीमेटम दिल्यानंतर सिनेनिर्माता करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' सिनेमाचं प्रदर्शनही रोखण्याचा इशारा मनसेने दिला आहे. मात्र करण जोहरच्या पाठिंब्यासाठी अभिनेता सलमान खान मैदानात उतरला आहे. या सिनेमात पाकिस्तानी कलाकार फवाद खानही एका भूमिकेत आहे. त्यामुळे या सिनेमाचं प्रदर्शन रोखण्याचा इशारा देत काल मनसेकडून करण जोहरच्या ऑफिससमोर आंदोलनही करण्यात आलं. करण जोहरच्या ऑफिसबाहेर मनसेचं आंदोलन ‘ए दिल है मुश्किल’ हा सिनेमा कोणताही अडथळा न येता प्रदर्शित होण्यासाठी सलमान खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला. सलमान आणि राज ठाकरे यांच्यात मैत्रीचे संबंध असल्यामुळे त्याने राज यांना फोन करून ‘ए दिल है मुश्किल’ आणि ‘रईस’ हे दोन्ही चित्रपट अडथळ्याविना प्रदर्शित होऊ द्यावे, अशी विनंती केली आहे. सलमान आणि करण जोहर यांच्यात फारसे चांगले संबंध नाहीत. मात्र करणसोबतचे जुने वाद विसरून सलमान त्याच्या बचावासाठी पुढे सरसावला आहे. ‘ए दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्या राय बच्चन ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर सिनेमातील मुख्य अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबतही सलमानचे वैयक्तिक कारणावरून वाद आहेत. ‘रईस’ या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान सोबत पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.