मुंबई : उरी हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरातून उमटताना पाहायला मिळत आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधानांकडून कठोर पावलं उचलली जात असतानाच मनसेनेही पाक कलाकारांना भारतातून 'चले जाव'चा इशारा दिला होता. त्यानंतर अभिनेता फवाद खानने गुपचूप घरचा रस्ता धरल्याचं वृत्त आहे.


पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने बॉलिवूडमध्ये आपलं नशिब आजमावलं होतं. 'जिंदगी' वाहिनीवर गाजलेल्या पाकिस्तानी मालिकेनंतर त्याने खूबसुरत, कपूर अँड सन्स सारख्या बॉलिवूडपटातूनही तरुणींवर अक्षरशः गारुड केलं होतं. करण जोहरच्या आगामी 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटातही तो मुख्य भूमिका साकारत आहे. मात्र मनसेच्या इशाऱ्यानंतर फवादने काढता पाय घेतला.

विशेष म्हणजे इतक्यात भारतात पाऊल ठेवण्याचा विचारही फवाद करणार नाही. मनसेच्या रडारवर असलेल्या पाकिस्तानी कलाकारांच्या यादीत फवादचा नंबर वरचा लागत असल्याची माहिती आहे. करण जोहरने यापूर्वीच फवाद आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग नसल्याचं स्पष्ट केलं होतं.