पुणे: पुण्याची पर्वती टेकडी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते गणपती मंदिर आणि फिरायला जाणाऱ्यांची गर्दी. पण याच पर्वती टेकडीवरती सैराट चित्रपटाचा उत्तरार्ध चित्रित करण्यात आला आहे. या टेकडीमागे असलेल्या जनता वसाहतमध्येच आर्ची आणि परशाचा संसार फुलताना दाखवला आहे.


 

करमाळ्यातल्या हृदयस्पर्शी प्रेमकहाणीनंतर सैराट चित्रपट वळतो तो थेट हैदराबादकडे. गावातून पळालेले आर्ची आणि परशा ट्रेननं हैदराबादेत पोहचतात आणि तिथे त्यांना भेटते अक्का.



अक्कानं दिलेल्या खोलीत आर्ची आणि परशाच्या संसाराला सुरुवात होते. ते घरही इथेच म्हणजे पुण्याच्या पर्वतीवर आहे. सामानाच्या अडगळीने भरलेली खोली आजही तशाच अवस्थेत आहे. परशा गळफास घेण्याचा प्रयत्न करतो तो लाकडी वासा, मोरी, स्वयंपाकाचा ओटा सर्व काही जसंच्या तसं चित्रपटात वापरण्यात आलं आहे. चित्रीकरणासाठी खोलीच्या उजव्या बाजूचा दरवाजा बंद करुन डाव्या बाजूला करण्यात आला. तसंच तिथे आर्चीला बसण्यासाठी एक छोटा ओटाही बांधण्यात आला होता.

 

पर्वतीच्या पायथ्यालाच असलेल्या याच किराणा मालाच्या दुकानातून आर्चीनं तिच्या आईला फोन लावला होता.

 

आज मोबाईलच्या जमान्यात कोणी पीसीओ वापरत नाही मात्र सैराटमुळे गोरख चव्हाण यांचा हा पीसीओ चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

 

आर्ची आणि परशाची प्रेमकहाणी फुलवणाऱ्या या सिनेमाचा शेवट धक्कादायक आणि सुन्न करणारा होता. तोही इथल्याच वारजे परिसरातल्या चौधरी चाळीत झाला आहे.

 

सैराटच्या यशानंतर ही चाळही पर्यटकांचं आकर्षण बनली आहे. लोकं आवर्जून इथं येऊन सेल्फी काढत आहेत.

 

एकूणच सैराटच्या यशानं एरव्ही दुर्लक्षित असलेल्या या ठिकाणांना उजेडात आणलंय..आणि इथल्या लोकांचंही जगणंही.