मुंबई : बॉलिवूडच्या रोमँटिक कपल्सपैकी एक मानल्या जाणाऱ्या अभिषेक-ऐश्वर्यामध्ये सरबजितच्या प्रिमिअरवेळी रेड कार्पेटवर काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर अभिषेक असुरक्षित असल्याच्या वावड्या उठल्या. 'अभिमान' सिनेमात जया-अमिताभ यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांची गोष्ट प्रत्यक्षात होत असल्याची शंका अनेकांनी उपस्थित केली. मात्र या प्रकरणी अभिषेकची बाजू आता समोर आली आहे.


 
बॉलिवूडलाईफ या वेबसाईटच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभि-अॅशमध्ये कुठलंही वादळ नाही. 'अभिषेककडे ऐश्वर्याच्या तुलनेत कमी प्रोजेक्ट्स असल्यामुळे त्याचा जळफळाट होत असल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. सरबजित हा ऐश्वर्याच्या दृष्टीने महत्त्वाचा सिनेमा आहे आणि तिच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणी अभिषेकला मध्ये यायचं नव्हतं. बच्चन आणि राय कुटुंब तिची साथ देण्यासाठी रेड कार्पेटवर होतं, मात्र तिच्यावरील प्रकाशझोत अभिषेकला दूर होऊ द्यायचा नव्हता. म्हणून तो निघून गेला. दोघांमध्ये कुठलेही वाद किंवा मतभेद नाहीत' असं बॉलिवूडलाईफच्या वृत्तात म्हटलं आहे.

 

 

काय घडलं नेमकं?

 

सरबजीतच्या प्रिमियरसाठी संपूर्ण बच्चन कुटुंब रेड कार्पेटवर अवतरलं होतं. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांना एकत्र टिपण्यासाठी फोटोग्राफर्सची एकच झुबंड उडाली होती.

 

बच्चन कुटुंबाचं फोटोसेशन झाल्यानंतर फोटोग्राफर्सनी अभिषेक आणि ऐश्वर्याला फोटोसाठी पोझ देण्याचा आग्रह धरला. अभिषेक बच्चन तयार झाला. मात्र काही फोटो काढून झाल्यावर, आता तुम्ही फक्त ऐश्वर्याचे फोटो काढा, या अनुषंगाचे हातवारे करून अभिषेकनं फोटोग्राफर्सचा निरोप घेतला. अभिषेकच्या अशा जाण्यानं ऐश्वर्याने आश्चर्य व्यक्त केलं.