2009 साली प्रदर्शित झालेला आणि आमिर खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘3 इडियट्स’ने तरूणाईला अक्षरश: वेड लावलं होतं. सिनेमातील अनेक गाणी आणि संवाद आजही तरुणाईच्या ओठांवर असतात. त्यामुळेच ‘3 इडियट्स’ च्या सिक्वेलची घोषणा चाहत्यांची उत्सुकता वाढवणारी आहे.
‘संजू’ सिनेमाच्या प्रमोशनवेळी याबाबत राजकुमार हिराणी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मी ‘3 इटियट्स’चा सिक्वेल बनवण्याचा विचार करत आहे. त्यासाठी स्क्रिप्टवर मी आणि सिनेमाचा लेखक अभिजीत जोशीने मिळून कामही सुरु केलं आहे. पण हे काम अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे.”
‘संजू’ रिलीज झाल्यानंतर राजकुमार हिराणी संजय दत्तसोबत ‘मुन्ना भाई 3’चे शुटिंग करणार आहेत. ‘मुन्ना भाई 3’चे शुटिंग पूर्ण होताच ‘3 इडियट्स’च्या सिक्वेलचं काम सुरु होईल.
दरम्यान, संजय दत्तच्या जीवनावर आधारित राजकुमार हिराणींचा ‘संजू’ सिनेमा 29 जूनला रिलीज होणार आहे. सिनेमात अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे.