मुंबई : बाहुबलीच्या दुसऱ्या भागासाठी दिग्दर्शक एस. राजमौली जीवापाड मेहनत करत आहेत. चित्रपटात देवसेनाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अनुष्काला राजमौलींनी वजन लवकर घटवण्याची तंबी दिल्याची माहिती आहे.


 
दाक्षिणात्य गॉसिप वेबसाईट चित्रमालाच्या माहितीनुसार राजमौलींनी अनुष्काला पुढील भागाच्या चित्रीकरणासाठी लवकरात लवकर 20 किलो वजन कमी करण्यास बजावलं आहे.

 

 

'साईज झिरो' या चित्रपटासाठी अनुष्काने 20 किलो वजन वाढवलं आहे. मात्र 'बाहुबली : द कन्क्ल्युजन' साठी तिला पुन्हा शेपमध्ये येण्यास राजमौलींनी सांगितलं आहे.

 
अनुष्का लवकरच बाहुबलीच्या सिक्वेलमधील तिच्या सीन्सचं शूटिंग सुरु करणार आहे. त्यासाठी योगा आणि व्यायाम करुन तिने वजन कमी करण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र राजमौलींनी तिला गरज पडल्यास लिपोसक्शन करुन घेण्याचा सल्लाही दिल्याचं म्हटलं जातंय.

 
राजमौलींनी फटकारल्यामुळे अनुष्का काहीशी खट्टू झाल्याची चर्चा आहे. आपण घेत असलेली मेहनत राजमौलींच्या लक्षात येत नाहीये, असा अनुष्काचा समज आहे. बाहुबलीच्या दुसऱ्या भागात देवसेनाच्या व्यक्तिरेखेला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे एकंदरीतच चित्रपटाच्या बारीकसारीक गोष्टींबाबत काटेकोर असलेले राजमौली अनुष्कावर चिडल्याचं मानलं जातंय.

 
बाहुबलीचा सिक्वेल पुढील वर्षी 14 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. बाहुबलीची मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रभाससह सर्वच कलाकार मेहनत घेत आहेत.