मुंबई : महाराष्ट्र सरकारतर्फे दिले जाणारे मानाचे असे राज कपूर आणि व्ही. शांताराम पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केली. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार अभिनेते धर्मेंद्र यांना, तर मराठी सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर झाला आहे.


याशिवाय, राज कपूर विशेष योगदान पुरस्कार दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना जाहीर झाला आहे.  तर व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार मृणाल कुलकर्णी यांना जाहीर झाले आहेत.

सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल राज्य सरकारतर्फे हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. धर्मेंद्र यांनी आजवर अनेक महत्वाच्या चित्रपटातून योगदान दिलं आहे. तर राजकुमार हिरानी यांनीही आपल्या चित्रपटातून सतत समाजाला उद्देशून काही भाष्य़ केले आहे. आपला मुद्दा मांडतानाच, व्यावसायिक यशही या चित्रपटांनी मिळवलं आहे.

यासोबत विजय चव्हाण यांचा गौरवही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण कामगार कल्याण मंचावरून आलेल्या या अभिनेत्याने व्यावसायिक रंगमंच गाजवला आणि मराठी चित्रपटातही आपलं मोठ योगदान दिलं.

यासोबत मृणाल कुलकर्णी यांनी मराठी मालिकांमधून सुरू केलेली वाटचाल आता दिग्दर्शनापर्यंत नेली आहे. त्यांना हा सन्मान मिळाल्याने त्यांची उमेद वाढेल यात शंका नाही.