फौजदारी खटल्यांविरोधात प्रिया प्रकाश सुप्रीम कोर्टात
एबीपी माझा वेब टीम | 19 Feb 2018 06:38 PM (IST)
'मनिक्या मलारया पूवी' या गाण्यावरुन निर्माण झालेला वाद निरर्थक असल्याचं प्रिया प्रकाश आणि दिग्दर्शकाने याचिकेत म्हटलं आहे.
नवी दिल्ली : इंटरनेट सेन्सेशन ठरलेली मल्ल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाशने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. हैदराबाद आणि मुंबईत आपल्याविरोधात दाखल केलेले फौजदारी खटले रद्द करण्याची मागणी प्रियाने केली आहे. 'ओरु अदार लव्ह' या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक ओमर अब्दुल वहाब यांनीही प्रियासोबत याचिका दाखल केली आहे. 'मनिक्या मलारया पूवी' या गाण्यावरुन निर्माण झालेला वाद निरर्थक असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. याचिकेत काय म्हटलंय? 'मनिक्या मलारया पूवी' हे मालाबार क्षेत्रातील मुस्लिम समाजाचं हे लोकगीत आहे. पैगंबर मोहम्मद आणि त्यांच्या पत्नी खदीजा यांच्यातील प्रेमाची त्याच तारीफ करण्यात आली आहे. 1978 मध्ये कवी पीएमए जब्बार यांनी हे गाणं लिहिलं होतं. गेली 40 वर्ष केरळमधील मुसलमान हे गाणं आनंदाने गात आहेत. अमल्ल्याळम भाषिकांनी निष्कारण वाद निर्माण केला आहे. गाण्यातून चुकीचा अर्थ काढून केस दाखल केली आहे, असं याचिकेत म्हटलं आहे. प्रिया आणि ओमर यांनी आपल्या मूलभूत अधिकारांचाही उल्लेख याचिकेत केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदेशीर पद्धतीने व्यवसाय करण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिला आहे. चित्रपटातील गाण्याचा चुकीचा अनुवाद करुन याचिकाकर्त्यांनी आपल्या अधिकारांचा अवमान केला आहे, असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. चित्रपटाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. दीड कोटी रुपये या सिनेमावर खर्च झाले आहेत. अमल्ल्याळम भाषिक व्यक्ती इतर राज्यांतही अशाप्रकारचे खटले दाखल करण्याची भीती आहे. त्यामुळे आतापर्यंत दाखल झालेल्या आणि पुढे दाखल होणाऱ्या खटल्यांपासून याचिकाकर्त्यांना संरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. औरंगाबादेतील जिन्सी पोलिस ठाण्यात जनजागरण समिती महाराष्ट्र संघटनेने तक्रार दाखल केली होती. 'मनिक्या मलारया पूवी' गाण्याचं इंग्रजीत भाषांतर केल्यावर इस्लाम धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं आढळलं, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तर हैदराबादमध्ये मुस्लिम समाजातील काही तरुणांनी प्रिया वारियरविरोधात फलकनुमा पोलिसात तक्रार दाखल केली होती.