मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने 4 वर्षांपूर्वी उद्योजक मित्र नेस वाडिया यांच्या विरोधात दाखल केलेल्या विनयभंगाच्या आरोप प्रकरणी मुंबई पोलिसांनी 200 पानी आरोपपत्र मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट इस्प्लानेड कोर्टात दाखल केलं आहे.


30 मे 2014 रोजी किंग्स इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान आयपीएल सामना सुरु असताना वाडिया यांनी विनयभंग केला, शिवीगाळ केली तसंच आपल्यावर हल्लाही केला, अशी तक्रार प्रीतीने मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात केली होती.

आयपीसी कलम 354 म्हणजे हल्ला करणं, कलम 506 गुन्हेगारी स्वरुपाचा त्रास देणं, कलम 509 विनयभंग करणं या कलमांअतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपपत्र दाखल करण्यात आलं त्यावेळी नेस वाडिया कोर्टात हजर होते. त्यांना 20 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आलं.

30 मे 2014 रोजी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान आयपीएल सामना सुरु असताना प्रीती झिंटाला वानखेडे मैदानाच्या गरवारे पॅव्हेलियनमध्ये बसलेलं पाहून वाडियांनी तिकीट वाटपावरुन आपल्या टीमच्या कर्मचाऱ्यांना सर्वांसमोर शिवीगाळ केली. त्यानंतर प्रीतीने आपली जागा बदलली. पण त्याने वाडियांचं समाधान झालं नाही, त्यांनी सगळ्या टीम सदस्यांच्यासमोर आपल्याला शिवीगाळ आणि असभ्य वर्तन केलं, असा आरोप प्रीतीने केला आहे.

शिवाय आपले हात जोरात खेचत आपल्यावर वाडियांनी हल्ला केला, असा आरोप प्रीतीने केला होता. वाडियांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. लवकरच या प्रकरणाची सुनावणी सुरु होऊन दोन्ही बाजूच्या साक्षीदारांची तपासणी होईल.

2005 ते 2010 या काळात प्रीती झिंटा आणि नेस वाडिया एकमेकांना डेट करत होते, असं बोललं जायचं. पण 2010 साली ते वेगळे झाले. पण त्यानंतरही त्यांची मैत्री कायम आहे. आयपीएलमधल्या किंग्स इलेव्हन पंजाब या संघाचे ते संयुक्त मालक आहेत.