अभिनय की राजकारण; रजनीकांत, कमल हासनची तारेवरची कसरत
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2018 04:15 PM (IST)
याचं ताजं उदाहरण म्हणजे एका कानडी संघटनेने रजनीकांत यांच्या 'काला' या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.
मुंबई : चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्धीचा राजकारणात फायदा झाल्याची अनेक उदाहरणे दक्षिण भारतात पाहायला मिळतात. परंतु एकाचवेळी चित्रपट आणि राजकारण या दोन्ही दगडांवर पाय ठेवल्याचा फटका आता रजनीकांत आणि कमल हासन यांना बसत असल्याचं दिसून येत आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे एका कानडी संघटनेने रजनीकांत यांच्या 'काला' या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी कर्नाटक आणि तमिळनाडू यांच्यातील पाणीप्रश्नात उडी घेत तमिळनाडूला पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती. याचाच निषेध म्हणून रजनीच्या या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी कर्नाटकात होत आहे. त्यामुळे एकाचवेळी अभिनेता आणि राजकारणी या भूमिका निभावणं कठीण असल्याचं या सगळ्या प्रकरणातून अधोरेखित होत आहे. निरीक्षकांच्या मते, राजकीय महत्त्वाकांक्षा असताना चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना अनेकदा टोकाची टीकाही सहन करावी लागते. 'काला'च्या निमित्ताने रजनीकांतला आलेल्या अनुभवाची प्रचिती कमल हासन यांना तर फार पूर्वीच आली होती. 2004 साली 'विरुमंदी' या तर 2013 साली 'विश्वरुपम' या कमल हासनच्या चित्रपटांच्या प्रदर्शनावेळी मोठा गदारोळ झाला होता. "राजकारणात असो किंवा नसो मी नेहमीच माझी मतं ठामपणे मांडली आहेत. चित्रपटांना लक्ष्य करणं ही राजकीय दादागिरी आहे," असं मक्कल नीधी मय्यम पक्षाचा नेता आणि अभिनेता कमल हासनचं म्हणणं आहे.