मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अरमान कोहलीनं आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी हायकोर्टात दाखल केलेली याचिका स्वीकारत कोर्टानं त्याची जेलमधून सुटका करण्याचे आदेश जेल प्रशासनाला दिले आहेत.

अरमान कोहलीच्या कुटुंबियांनी पीडित नीरु रंधावा हिच्याशी यशस्वी तडजोड केल्यानं तिने आपली तक्रार आपण मागे घेत असल्याचं हायकोर्टाला कळवलं. त्याचबरोबर समाजसेवा म्हणून हायकोर्टानं अरमान कोहलीला 1 लाख रूपये टाटा मेमोरियलच्या लहान मुलांसाठीच्या शाखेला आणि 1 लाख रूपये नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंडला देणगी म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.

अरमान कोहलीनं हायकोर्टात कबुल केलंय की “झालेल्या चुकीचा मला पश्चाताप होतो आहे. यापुढे अशी चूक आपल्याकडून होणार नाही.” मुळात ब्रिटश नागरीक असलेल्या नीरु रंधावानं कोहली कुटुंबियांकडून ठरलेली रक्कम स्वीकारत असल्याचं कोर्टाला कळवलं. डोक्याला मलमपट्टी केलेली नीरु रंधावा सुनावणीसाठी हायकोर्टासमोर हजर झाली होती.

आपली मैत्रिण नीरू रंधावाला मारहाण केल्याबद्दल अभिनेता अरमान कोहली विरोधात मुंबईच्या सांताक्रुझ पोलीस स्थानकांत गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी अरमानला 12 जून रोजी लोणावळ्याहून अटक करण्यात आली होती. बुधवारी वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टानं अरमान कोहलीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत त्याचा जामीन अर्जही नामंजूर केला होता.

आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी अरमान कोहलीनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या सुनावणीसाठी अरमानचे वडील आणि जेष्ठ सिने निर्माता राजकुमार कोहली आणि इतर कुटुंबीय हायकोर्टात उपस्थित होते.

अरमानने आपल्याला बेदम मारहाण केल्याची तक्रार त्याची गर्लफ्रेंड नीरु रंधावाने गेल्या आठवड्यात मुंबईतील सांताक्रुझ पोलिसात केली होती. त्यानंतर अरमान पसार झाला होता. त्याच्यावर कलम 323, 326, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मारहाणीत नीरु रंधावाच्या डोक्याला जबर मार लागला होता. तिच्यावर अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. अरमान आणि नीरु यांच्यात घटनेच्या आदल्या दिवशी पैशांच्या देवाणघेवाणीवरुन शाब्दिक बाचाबाची झाली होती.

तारक मेहता...मधील बबितालाही मारहाण

अरमान कोहली यापूर्वीही अनेकदा वादात अडकला होता. अरमान कोहलीने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील बबिता अर्थात मुनमुन दत्ताला डेट केलं होतं. 2008 साली मुनमुन आणि अरमानची ओळख झाली होती, मात्र अल्पावधीतच त्यांची मैत्री संपुष्टात आली. नात्यातील ताणतणावातून अरमानने मुनमुनलाही मारहाण केली होती.

बिग बॉसच्या घरात शिव्या

'बिग बॉस'च्या घरात असतानाही अरमानचा स्वत:वरील ताबा सुटला होता. त्यावेळी त्याने सहस्पर्धकांना शिवीगाळ केली होती. प्रकरण अखेर बाचाबाचीवर आलं. अभिनेत्री सोफिया हयातच्या तक्रारीनंतर अरमानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामिनावर तो बाहेर आला.

काजोलच्या बहिणीशी जवळीक

बिग बॉसच्या घरात असताना अभिनेत्री काजोलची बहीण तनिषासोबत अरमानची जवळीक वाढली होती. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं.

संबंधित बातम्या :

‘जानी दुश्मन’फेम अरमान कोहलीची गर्लफ्रेण्डला मारहाण

गर्लफ्रेण्डला मारहाण प्रकरण, अभिनेता अरमान कोहलीला अटक