मुंबई : पहिलं प्रेम हे प्रत्येकाच्या हृदयाच्या जवळचं असतं, असं म्हटलं जातं. बॉलिवूड कलाकारही याला अपवाद नाही. कारण, पहिलं प्रेम विसरता येत नाही, अशी आठवण अभिनेत्री तापसी पन्नूने सांगितली. दहावीच्या परीक्षांमुळे त्यावेळी माझ्या बॉयफ्रेण्डने ब्रेकअप केलं होतं, असा किस्सा 31 वर्षीय तापसीने सांगितला.


भुवनेश्वरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात तापसीने आपल्या पहिल्या प्रेमाची गुलाबी आठवण सांगितली. 'मी नववीमध्ये असताना पहिल्यांदा रिलेशनशीपमध्ये अडकले. माझ्या मित्र-मैत्रिणींच्या तुलनेत मला काहीसा उशीरच झाला होता. माझं अफेअर खरंच मजेशीर होतं. दहावीच्या बोर्ड परीक्षा येत आहेत, मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायंच आहे, असं सांगून तो मला सोडून गेला' असं तापसीने हसत हसत सांगितलं.

'मला अजूनही आठवतं.. त्याकाळी आमच्याकडे मोबाईल फोन नव्हते. मी माझ्या घरामागे असलेल्या पीसीओवर जाऊन त्याला फोन करायचे आणि रडत रडत विचारायचे, मला सोडून का जात आहेस?' असं तापसीने सांगितलं.

'माझी सूर्यरास सिंह आहे आणि जन्म एक ऑगस्टचा. एक आणि सिंह (लिओ) हे भयंकर कॉम्बिनेशन आहे. कामात आणि वैयक्तिक आयुष्यात मला सेंटर ऑफ अटेंशन व्हायला आवडतं. जर माझा पार्टनर सहज नियंत्रणात येत असेल, तर मला मजा येत नाही. त्यात काय एक्साईटमेंट! मला जोडीदार असा हवा, ज्याच्याकडे मी आदराने पाहावं' असं तापसी भरभरुन सांगते.

'जेव्हा-जेव्हा मी रिलेशनशीपमध्ये असते, तेव्हा मला वाटतं. झालं! ठरलं! मी त्याच्यासोबत माझ्या आयुष्याचं-मुलाबाळांचं चित्र रंगवते. पण ते स्वप्न काही दिवसांत दुभंगतं. मग मी मनाशी म्हणते, हा नसेल, पुढचावाला असेल' असंही तापसी गमतीने सांगते.

तापसीने 2010 मध्ये तेलुगू चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. 2012 मध्ये चष्मेबद्दूर सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बेबी, पिंक, द गाझी अॅटक, नाम शबाना, मुल्क, मनमर्झिया यासारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत.