मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह आणि अर्जुन कपूरला एआयबीप्रकरणी तात्काळ दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.


रणवीर सिंह आणि अर्जुन कपूरने त्यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. मात्र या याचिकेची प्रत तक्रारदारांना न दिल्यामुळे हायकोर्टाने याप्रकरणी मंगळवारी सुनावणी घेण्यास नकार देत, याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.

न्यायमूर्ती आर.एम. सावंत आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.

डिसेंबर 2014 मध्ये मुंबईच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया इथे आयोजित एआयबी रोस्ट या कार्यक्रमात महिलांच्या बाबतीत अत्यंत बिभस्त आणि कमरेखालचे विनोद करण्यात आले होते. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ता आभा सिंह यांनी जोरदार विरोध करत यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

तक्रारदार संतोष दौंडकर यांनी गिरगाव कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने फेब्रुवारी 2015 मध्ये यासंदर्भात मुंबई पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे निर्देश दिले होते.

याप्रकरणी रणवीर सिंह आणि अर्जुन कपूरसह करण जोहर, दीपिका पादूकोण, आलिया भट यांच्यासह कार्यक्रमाच्या आयोजकांचाही समावेश आहे. समाजात एकीकडे महिलांवर अत्याचार होत असताना सार्वजनिक ठिकाणी महिलांवर इतक्या खालच्या पातळीवर केलेले विनोद कसे काय खपवून घेतले जातात? तसंच तिथे दीपिका आणि आलियासारख्या तरुण पिढीच्या प्रतिनीधी हसत हसत हे विनोद कसे काय एन्जॉय करु शकतात? असा सवाल या याचिकेतून विचारण्यात आला आहे.