मुंबई : अंजली श्रीवास्तव नावाच्या नवोदित अभिनेत्रीने आत्महत्या केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. 29 वर्षीय अंजलीने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं.


अंजलीचे नातेवाईक तिला वारंवार फोन करत होते, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी घरमालकाशी फोनवरुन संपर्क साधला. घरमालकाने डुप्लिकेट चावीच्या मदतीने दरवाजा उघडला असता अंजली साडीने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

घरमालकाने तात्काळ पोलिसांना पाचारण केलं. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अंजली अंधेरीतील जुहू परिसरातल्या परिमल सोसायटीत राहत होती.

घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही. मात्र अंजलीने आत्महत्या कधी आणि का केली, याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

गेल्याच आठवड्यात मॉडेल-अभिनेत्री कृतिका चौधरीच्या हत्येची घटना समोर आली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसात आलेल्या आणखी एका अभिनेत्रीच्या मृत्यूच्या वृत्तामुळे मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे.