भारताच्या पराभवानंतर ऋषी कपूर यांचं ट्वीट
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2017 01:19 PM (IST)
मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 वर पाकिस्ताने आपलं नाव कोरलं. अंतिम फेरीत पाकिस्तानने टीम इंडियाचा तब्बल 180 धावांनी धुव्वा उडवत विजेतेपद पटकावलं. भारत-पाकिस्तानमधील जवळपास सगळ्याच नागरिकांनी हा सामना पाहिला. सामन्यानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर आधार घेतला. यात बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नव्हते. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याआधी पाकिस्तानला आव्हान देणारे अभिनेते ऋषी कपूर यांनीही भारत-पाकिस्तान सामन्यानंतर ट्वीट केलं. भारताचाच विजय होणार अशा विश्वास असलेल्या ऋषी कपूर यांनीही पराभव स्वीकारला. "होय, पाकिस्तान, तुम्ही आम्हाला हरवलंत. चांगले खेळलात, प्रत्येक आघाडीवर आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली. खूप अभिनंदन, मी पराभव स्वीकारतो, शुभेच्छा", असं ट्वीट ऋषी कपूर यांनी केलं आहे. https://twitter.com/chintskap/status/876465937880305664 ऋषी कपूर यांचे पूर्वीचे ट्वीट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारल्यानंतर ऋषी कपूर यांनी ट्वीट करुन, पाकिस्तानला त्यांच्या स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र आता फायलनमध्ये भारताकडून हरण्यासाठी तयार राहा अशा आशयाचं ट्वीट केलं होतं. "विजयाबद्दल अभिनंदन, तुम्हाला भारताच्या निळ्या रंगात पाहून चांगलं वाटलं. आता भारताकडून हरण्यासाठी तयार राहा," असं ट्वीट ऋषी कपूर यांनी केलं. https://twitter.com/chintskap/status/875024879501717506 या ट्वीटवरुन पाकिस्तानी चाहत्यांनी ऋषी कपूर यांच्यावर टीकेचा भडीमार केला होता. त्याला उत्तर देताना ऋषी कपूर म्हणाले, "तुम्ही जिंका, हजार वेळा जिंका. फक्त दहशतवाद थांबवा. मला हार मान्य आहे. आम्हाला शांतता आणि प्रेम हवं" https://twitter.com/chintskap/status/875447907922567170