मुंबई : बॉलिवूडमध्ये नाम कमवण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेल्या एका उदयोन्मुख तरुणीची अतिशय निर्घृणपणे हत्या करणाऱ्या दोन ज्युनिअर आर्टिस्टना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं. 2012 साली घडलेल्या मिनाक्षी थापा हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या अमित जयस्वाल आणि प्रीती सरिन या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरलं.


आयपीसी कलम 302, 364(अ), 120(बी), 201 आणि आयटी अॅक्टखाली या दोघांना दोषी ठरवण्यात आलं. विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे गुरुवारी या दोघांच्या शिक्षेवर युक्तीवाद करतील.

काय आहे प्रकरण?

देहरादूनहून मुंबईत येण्याआधी 26 वर्षीय मिनाक्षी थापा ही डान्स स्कूल आणि स्केटिंग स्कूलमध्ये इंस्ट्रक्टर म्हणून काम करत होती. मुंबईत आल्यावर तिने फ्रँकफिनमध्येही कोर्स केला. आपल्या मेहनतीने तिने 'सहेर', '404' अशा काही हिंदी सिनेमांत छोटे-छोटे रोल्सही मिळवले होते.

मधुर भंडारकर यांच्या 'हिरॉईन' या सिनेमाच्या सेटवर मिनाक्षीची अमित जयस्वाल आणि प्रीती सरिन या दोन ज्युनिअर आर्टिस्टशी ओळख झाली. या दोघांना प्रीतीने आपण एका श्रीमंत घरातून असल्याची माहीती दिली. तसेच आपण केवळ आवड म्हणून बॉलिवूडमध्ये काम करत असल्याचं तिने या दोघांना सांगितलं. याचाच फायदा घेऊन अमित आणि प्रीतीने मिनाक्षीचं पैशांसाठी अपहरण केलं.

अपहरण केल्यानंतर त्यांनी थापा कुटुंबीयांकडून 15 लाखांची मागणी केली. मिनाक्षीच्या आईन कसेबसे 60 हजार रुपये जमा केले. यावरुन त्यांना मिनाक्षीच्या फोलपणाची कल्पना आली. त्यानंतर त्यांनी अलाहबाद इथे मिनाक्षीचं डोकं धडापासून वेगळं करत तिची हत्या केली.

मिनाक्षीचं धड अलाहबादच्या एका गटारात टाकून तिच्या धडासह दोघे बसने गोरखपूरला रवाना झाले. पुढे चालत्या बसमधून त्यांनी मिनाक्षीचं मुंडकं रस्त्यात फेकून दिलं. जे आजवर पोलिसांना सापडलेलं नाही. मिनाक्षीची हत्या करुन अमित आणि प्रीतीने तिचा मोबाईल आणि एटीएम कार्ड आपल्या ताब्यात घेतलं होतं. जेणेकरून तिच्या अकाऊंटमधील पैसे सहज काढता येतील.

अमित जयस्वाल आणि प्रीती सरीन कोण आहेत?

अमित जयस्वाल आणि प्रीती सरीन हे दोघेही मूळचे अलाहाबादचे आहेत. अमितचे वडील हे तिथे एक नामांकीत वकील आहेत. अमितचं लग्न झालं असून त्याला दोन मुलंही आहेत. अमितला सुरुवातीपासूनच शानशौकीत राहण्याची आवड होती. तसेच त्याला फिल्मी दुनियेचं विलक्षण आकर्षण होतं.

अमित अलाहबादमध्ये एक कोचिंग क्लास चालवायचा. तिथेच त्याची प्रीतीशी ओळख झाली. प्रीतीचे वडील तिथे एका शाळेत काम करतात. प्रीतीलाही फिल्मी दुनियेचं वेड होतं. त्यामुळे या दोघांच्या मैत्रीचं पुढे प्रेमात रुपांतर झालं. घरच्यांच्या विरोधाला कंटाळून एक दिवस दोघांनी अलाहबाद सोडलं आणि मुंबई गाठली आणि सिनेमात छोटीमोठी कामं करू लागले.

दरम्यान, मुळातच उंची राहणीमानाचं आकर्षण असल्याने लवकरच त्यांना पैशांची चणचण भासू लागली. मग झटपट पैसे कमवण्याच्या नादात असतानाच त्यांची मिनाक्षीशी ओळख झाली. झटपट श्रीमंतीच्या नादात त्यांनी मिनाक्षीचं आधी पैशांसाठी अपहरण केलं आणि मग निर्घृण हत्या केली.