मुंबई: राखी सावंतला अटक करण्यासाठी मुंबईत आलेल्या लुधियाना पोलिसांना रिकाम्या हाती परतावं लागलं आहे. राखी सावंत तिच्या घरी उपस्थित नसल्यामुळं पोलिसांना कारवाई करता आली नाही. 'राखी सावंत आम्हाला भेटलीच नाही. त्यामुळे तिला अटक करता आली नाही.' अशी माहिती लुधियाना पोलिसांनी दिली.


वर्षभरापूर्वी महर्षी वाल्मिकीसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी पंजाबमध्ये राखी सावंत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याप्रकरणी कोर्टानं अटक वॉरंट बजावल्यानंतर पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालं होतं.

अटकेपूर्वीच राखीने फेसबुकवर व्हिडीओ शेअर करुन माफी मागितली होती. व्हिडीओत राखी म्हणते की,जर वाल्मिकी ऋषींबाबत काहीही चुकीचं बोलले असेन तर मी वाल्मिकी समाजाची क्षमा मागते. मला कोणालाही दुखवायचं नाही. मला कधीही वाईट बोलायचं नव्हतं. जे शाळेत शिकले, तेच मी बोलले. तरीही मी जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा. मी तुम्हा सगळ्यांवर प्रेम करते.

काय आहे प्रकरण?
मागील वर्षी राखी सावंतने वाल्मिकी ऋषींबद्दल आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली होती. या टिप्पणीमुळे वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत, तिच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. यानंतर लुधियाना न्यायालयाने वारंवार समन्स बजावूनही ती न्यायालयात हजर न राहिल्याने तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं.

संबंधित बातम्या:

आक्षेपार्ह टिप्पणीबाबत राखी सावंतचा माफीनामा