Kiran Mane : अभिनेते किरण माने (Kiran Mane) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अभिनयासह समाजकारणातही ते सक्रीय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते व्यक्त होत असतात. आता छत्रपतींच्या गादीचा अपमान झाल्याबद्दल त्यांनी टीका केली आहे. छत्रपतींच्या गादी विषयीचा आदर तसूभरही कमी होणार नाही, असं किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये (Kiran Mane Post) म्हटलं आहे. छत्रपतींच्या गादीचा अपमान झाल्याने किरण माने भडकले आहेत. त्यांची पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच व्हायरल होत आहे. किरण माने अभिनेते असण्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shivsena Uddhav Thackeray) नेते आहेत. सत्ताधाऱ्यांवर नेहमीच ते टीका करताना दिसून येतात. आता छत्रपतींच्या कोल्हापूर आणि सातारा गादीविषयी त्यांची पोस्ट केली आहे.


किरण मानेंची पोस्ट काय? (Kiran Mane Post)


कोल्हापूर असो वा सातारा... छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय. गादीला मत दिलं-नाही दिलं तरी, अपमानकारक विधानं करुन कधीच कोणी महामानवांशी प्रतारणा नाही केली. सातारचे आदरस्थान छत्रपती उदयनराजे भोसले मनुवाद्यांचा रस्ता पकडला म्हणून जनतेनं त्यांचा पराभव केला. पण त्यावेळीही त्या गादीचा अवमान होईल असा एकही शब्द कोणी बोलत नव्हतं. आज मी स्पष्ट शब्दांत सांगू शकतो की छत्रपती उदयनराजे जर भाजपाकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही. पण त्यांच्या गादीविषयीचा आदर मात्र तसूभरही कमी होणार नाही. व्यक्ती वेगळी-महामानवांची गादी वेगळी. परवा कोल्हापूरात व्यक्तीला विरोध करताना घसरुन सरळसरळ त्या गादीचाच अत्यंत वाईट अपमान केला गेला. ही खूप घृणास्पद गोष्ट आहे. याहून मोठा कृतघ्नपणा असूच शकत नाही". 



किरण माने यांनी लिहिलं आहे,"मनुवाद्यांची घरातली कुजबूज स्वरुपातली भाषा आज लाचार बहुजनांकडून वदवून घेतली जात आहे. ते लक्षात घ्या. पाठीचा कणा मोडून वर्चस्ववादी सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला गेलेला प्रत्येक नेता जे बोलतोय ते त्याचे स्वत:चे मत नाही. त्याच्या नाजूक जागा पकडीत चेंबटून त्याच्याकडून ते बोलून घेतलं जातंय. वयाची 60-65 वर्ष ज्या चुलत्याच्या मार्गदर्शनाखाली वाटलाच केली. ज्या चुलत्यानं मुलगा मानून मतदारसंघ आणि मोठमोठ्या पदांचा धनी बनवलं. त्या चुलत्याला मी एकवेळ विरोध करेन. पण वावगं बोलायची आपली कोणाची जीभ रेटेल का? समजा, मी रिक्षावाला होतो. ज्या घरानं, कुटुंबानं मला नाव, पैसा, मानसन्मान दिले. त्या घराच्या मी एकवेळ विरोधात जाईन. पण त्या घराविषयी मी चुकीचा एक तरी शब्द काढेन का?". 


किरण माने यांनी पुढे लिहिलं आहे,"यांचे 'बोलविते धनी' वेगळे आहेत. मतदारांनो ते ओळखा. आपल्या महामानवांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य खर्ची घातलंय. मनुवाद्यांची सगळी कटकारस्थानं, खोट्या बदनामीचे घाव झेललेत. त्यांच्याशी गद्दरी करू नका. कोल्हापूरचे शाहू छत्रपती भाजपाकडून उभे राहिले असते तर आम्हीही त्यांना विरोध केला असता. पण या पातळीवर नक्कीच उतरलो नसतो. पण आपल्या सुदैवाने ते शाहू या समतेच्या विचारधारेची नाळ जपणारे आहेत. वर्चस्ववाद्यांना ठेचायला मैदानात उतरले आहेत. त्यांचे हात बळकट करून मातीशी इमान राखणं हे प्रत्येक कोल्हापूरकराचं कर्तव्य आहे. जय शिवराय... जय भीम!". 


संबंधित बातम्या


Kiran Mane on Rohit Pawar : 'तुम्ही लाचार झालेले आम्हाला चालणार नाही', रोहित पवारांसाठी किरण मानेंची पोस्ट; सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत ओढले ताशेरे