मुंबई  : बॉलिवूडच्या (Bollywood) गेल्या काही वर्षांपासून घरघर लागली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. अनेक दिग्गज सुपरस्टार्सचे चित्रपट फ्लॉप ठरताना पाहायला मिळत आहेत. त्याशिवाय सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेटमध्ये झालेली वाढ पाहता प्रेक्षक चित्रपटगृहात जाणं टाळतात किंवा अगदी बोटावर मोजण्याइतके चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहतात. बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने बॉलिवूडमधील वाईट परिस्थितीवर भाष्य केलं आहे.


फिल्म इंडस्ट्रीतील वाईट परिस्थितीवर करण जोहरचं भाष्य


गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडच्या सुपरस्टार्सचे बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडताना पाहायला मिळत आहे. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान अक्षय कुमार यासारख्या बड्या अभिनेत्यांचा समावेश आहे. या प्रकरणावर चित्रपट निर्माता करण जोहरने (Karan Johar) उघडपणे बोलले आहे. इंडस्ट्रीत मोजकेच चांगले कलाकार आहेत, असे त्याने म्हटले आहे. याशिवाय आता प्रेक्षकांची चवही बदलली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


'बॉलिवूडमध्ये फक्त 10 अभिनेते कामाचे, तेही चंद्र-तारे मागतायत'


करण जोहरने फेय डिसूझाच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हिंदी चित्रपटांच्या वाईट स्थितीवर आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 'सर्वप्रथम म्हणजे प्रेक्षकांची आवड खूपच मर्यादित झाली आहे. त्यांना विशिष्ट प्रकारचा सिनेमा हवा आहे आणि जर तुम्हाला त्या मर्यादेत काम करायचं असेल, तर तुमचा चित्रपट A, B आणि C केंद्रावर आधारित सादर करावा लागेल. त्यासाठी फक्त मल्टिप्लेक्स पुरेशे नाहीत.


फक्त 10 कलाकार कामाचे आहेत आणि तेही...


करण जोहरने चित्रपटांचं वाढतं बजेट आणि स्टार्सच्या मागण्यांबाबत मत व्यक्त करताना म्हटलं की, चित्रपट निर्मितीचं बजेट वाढलं आहे, महागाई वाढली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत जेमतेम 10 उपयुक्त कलाकार आहेत आणि तेही सूर्य, चंद्र आणि पृथ्वीची मागणी करत आहेत. एकतर, तुम्ही त्यांना पैसे देणार, मग तुम्ही चित्रपटासाठी पैसे देणार आणि मग मार्केटिंगचा खर्च येतो आणि मग तुमचा चित्रपट चांगला कमाई करत नाही, असंही त्याने सांगितलं.


कलाकारांच्या मानधनावर प्रतिक्रिया


करण जोहर पुढे म्हणाला की, जे कलाकार 35 कोटी रुपये मागत आहेत ते 3.5 कोटी रुपयांनी ओपनिंग करत आहेत. हे गणित कसे चालणार? तुम्ही हे सर्व कसे मॅनेज करु शकाल? प्रत्येक दशकात वेगळ्या प्रकारची पद्धत पाहायला मिळत आहे. इंडस्ट्रीला अजूनही हे समजू शकलेलं नाही की, आता प्रेक्षकांना भारतीय सिनेमा त्याच्या मुळाशी जोडलेला आणि शुद्ध मनोरंजन हवं आहे.


जवान, पठाण चित्रपटाबद्दल काय म्हणाला करण?


करण जोहर म्हणाला, 'सध्या आमची अशी स्थिती आहे की जर जवान आणि पठाण चित्रपट चालले, मग  आम्ही फक्त ॲक्शन चित्रपट करायचे का? मग सगळे त्याच्याच मागे धावत असतात. मग अचानक एक लव्ह स्टोरी चालेल. मला असं वाटतं की, आपण डोकं नसलेल्या कोंबड्यांसारखे पळत आहोत. लोकांना खात्री नाही आणि सर्वांची झुंड मानसिकता झाली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा