मुंबई : अवैध बांधकाम प्रकरणी अभिनेता इरफान खान आणि कपिल शर्मा या दोघांना मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास दिलासा दिला आहे. दिलासा मिळणं म्हणजे काम सुरु ठेवणं असं नसल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.


इरफान खान आणि कपिल शर्माला हायकोर्टाने दोन आठवड्यांपुरता दिलासा दिला आहे. पुढचे दोन आठवडे आपल्या बांधकाम क्षेत्रात कोणतंही काम सुरु ठेवू नका, किंवा त्यात बदल करु नका, असं कोर्टानं म्हटलं आहे.

गोरेगावमधल्या डीएलएफ इल्केव्ह नावाच्या इमारतीत इरफान खान आणि कपिल शर्मा हे दोघे राहतात. मात्र दोघांनी आपल्या राहत्या घरात अवैध पद्धतीनं बदल करुन बांधकाम केल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेनं त्यासंदर्भात दोघांना नोटीसही बजावली आहे.

याविरोधात दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. महापालिकेने आपल्याला आधीच एक नोटीस पाठवलेली असल्यामुळे पुन्हा नोटीस पाठवणं बेकायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलं. पुढच्या सुनावणीत यावर उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने पालिकेला दिले आहेत.