Kangana Ranaut Controversy: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतकडून मागील काही महिन्यांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जात आहे. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले. खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केले होते. तिच्या या वक्तव्यावर देशभरातून टीका होत असताना तिचा पद्म पुरस्कार काढून घेण्याची मागणी करण्यात येत आहे. आता या वादावर कंगनाने स्पष्टीकरण देताना पुन्हा एकदा बरळली आहे. मी पद्म पुरस्कार परत करण्यास तयार आहे. मात्र, 1947 मध्ये नेमकं काय झाले हे कोणीतरी सांगावे असेही कंगनाने म्हटले. 


कंगनाने इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये काही पोस्ट शेअर केल्या आहेत. तिने म्हटले की, मुलाखतीत स्पष्टपणे म्हटले की, स्वातंत्र्याची पहिली संघटित लढाई 1957 मध्ये लढण्यात आली. त्याशिवाय राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर यांच्या बलिदानाबाबतही माहिती दिली. मला सन 1857 मध्ये काय झाले याची माहिती आहे. मात्र, 1947 मध्ये कोणते युद्ध झाले होते याची माहिती नाही. कोणी याबाबत माहिती दिली तर मी पद्म पुरस्कार परत करेल आणि माफी मागेल असेही कंगनाने म्हटले. 




मी राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या चित्रपटात काम केले आहे. स्वातंत्र्याची पहिली लढाई 1857 मध्ये झाली. त्यावर संशोधन केले होते. राष्ट्रवादासह उजव्या विचारसरणीचाही उदय त्यावेळी झाला होता. भगत सिंग यांना महात्मा गांधी यांनी का मरू दिले? नेता बोस यांची हत्या कशी झाली? त्यांना गांधींनी सहकार्य का केले नाही? फाळणी एका गोऱ्या अधिकाऱ्याने का केली? स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्याऐवजी लोक एकमेकांची हत्या का करत होते? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यास उत्सुक असून लोकांनी मदत करावी असे कंगनाने म्हटले. 




आज इतिहास साक्षी आहे की इंग्रजांनी भारताची अत्यंत निर्दयीपणे लूट केली. देशातील अत्यंत गरिबी, दुष्काळ आणि प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर दुसऱ्या महायुद्धाचे दडपण सहन करणे त्यांच्यासाठी कठीण होत चालले होते, पण हे त्यांच्या लक्षात आले. शतकानुशतके केलेल्या अत्याचारांची किंमत चुकवल्याशिवाय देश सोडता येणार नाही, हे त्यांना ठाऊक होते. अशा परिस्थितीत त्यांना भारतीयांच्या मदतीची गरज होती. INA द्वारे छोट्याशा लढ्यानेही आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असते आणि अशा परिस्थितीत सुभाषचंद्र बोस स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होऊ शकले असते. त्यावेळी उजव्या विचारसरणीच्या संघटना लढण्यास तयार होत्या. अशा परिस्थितीत देशाचे स्वातंत्र्य काँग्रेसच्या कटोऱ्यात का टाकले, कोणी ही बाब मला सांगेल का असे कंगनाने म्हटले. 







कंगनाने म्हटले की, या प्रश्नाचे कोणी उत्तर दिल्यास मी आनंदाने पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार आहे. मी शहिदांचा अपमान केला आहे, हे कोणी सांगितल्यास मी पुरस्कार परत करण्यास तयार असल्याचे कंगनाने म्हटले. 


आपण शरीराने स्वातंत्र्य होतो. मात्र, भारताची चेतना आणि अंतराम्याला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. एक मरणासन्न सभ्यता पुन्हा उदयास आली असून तिच्या पंखात बळ आले असल्याचे कंगनाने म्हटले. त्या मुलाखतीत आपण बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. मात्र, जे चोर आहेत, त्यांची जळणारच असेही कंगनाने म्हटले.