... तर उद्या वाहनांवरही बंदी आणणार का, कमल हसनचा सवाल
एबीपी माझा वेब टीम | 24 Jan 2017 02:45 PM (IST)
चेन्नई : जलीकट्टूच्या समर्थनार्थ आता अभिनेता कमल हसनही मैदानात उतरला आहे. जर वाहनांमुळे अपघात होऊन लोकांचे जीव जात असतील, तर उद्या वाहनांवरही बंदी घालणार का, असा सवाल कमल हसनने विचारला आहे. देशातल्या अनेक कायद्यांमध्ये अमूलाग्र बदलांची गरज असल्याचंही कमल हसनने म्हटलं आहे. शिवाय कोणत्याही प्रकारच्या बंदीविरोधात आपण असल्याचं त्याने म्हटलं. पोलिसांवरही कमल हसनने ताशेरे ओढले असून चेन्नईतील हिंसेत पोलिसही सहभागी असल्याचा आरोप केला आहे. जलीकट्टूच्या समर्थनार्थ तामिळनाडूमध्ये हिंसक आंदोलनाचं सत्र सुरुच आहे. चेन्नईपासून कोईम्बतूरपर्यंत राज्यभरात जलीकट्टूचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांनी पोलिस ठाण्यालाच आग लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. जलीकट्टू समर्थनाला हिंसक वळण चेन्नईच्या मरिना बीचवर आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला. तामिळनाडू सरकारनं जलीकट्टूसाठी विशेष अध्यादेश काढल्यानंतर मागणी पूर्ण झाली असं सांगत पोलिसांनी आंदोलकांना मरिना बीच सोडण्याची विनंती केली. पण आंदोलकांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यानंतंर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिकार म्हणून आंदोलकांनी मरिना बीचवरील पोलिस ठाण्याला आग लावली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूत भडकलेला जलीकट्टूचा वणवा अद्यापही पेटताच असल्याचं चित्र आहे.