'सैराट'च्या 'आर्ची-परशा' प्रमाणे 'रवी-मनिषा'चा अंत
एबीपी माझा वेब टीम | 13 May 2016 06:02 AM (IST)
शहापूर : राज्यात सध्या नागराज मंजुळेच्या 'सैराटने धुमाकूळ घातला आहे. चित्रपटातील आर्ची आणि परशाची प्रेमकहाणी सगळ्यांना आवडत आहे. मात्र शेवट पाहून अनेकांना धक्का बसला. परंतु याच 'सैराट'ची पुनरावृत्ती शहापूर तालुक्यातील कोळीपाडा इथे झाली. कोळीपाडा इथल्या घनदाट जंगलात गावातील तरुण-तरुणीचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली आहे. कोळीपाडा येथील तरुण रवी हेमा काळचीडा आणि तरुणी मनीषा सोमा पोकळा हे 18 एप्रिलपासून बेपत्ता होते. नातेवाईकची त्याचा शोध घेत होते. मात्र आज सकाळी कोळीपाडा इथल्या जंगलात दोन मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याचं गावकऱ्यांनी किन्हवली पोलिसांना कळवलं. अधिक तपास केला असता हे मृतदेह रवी आणि मनीषा यांचेच असल्याची खात्री पटली. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने शेंद्रून प्राथमिक केंद्राच्या डॉक्टरांना बोलावून घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आलं. किन्हवली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. संबंधित घटना 'सैराट'शी साधर्म्य साधणारी आहे. परंतु आपल्या मुलाचा खून झाला असून, संशयितांची नावं सांगूनही स्थानिक पोलिस दुर्लक्ष करत आहे, असा आरोप रवीच्या आई-वडिलांनी केला आहे. तर या प्रकरणाचा तपास सुरु असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील तपासाला वेग येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.