मुंबई : काजोल, शाहरुख आणि करण जोहर हे कोणे एके काळी बॉलिवूडमधलं बेस्ट फ्रेण्ड्सचं त्रिकूट. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम यासारखे सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले. मात्र यापुढे आपण करण जोहरसोबत काम करणार नसल्याचं काजोलने सांगितलं आहे.


'व्हीआयपी 2' चं प्रमोशन करणाऱ्या काजोलला पत्रकारांनी करणविषयी प्रश्न विचारले, मात्र तिने सुरुवातीला थेट उत्तर देणं टाळलं. मला काम करताना कम्फर्टेबल वाटतं, त्यांच्यासोबतच फिल्म करणार, असं काजोल म्हणाली.

आपसात संवाद हा तर काम करण्यासाठी गरजेचा आहे. जर तुम्ही एखाद्याशी बोलत नसाल, तर काम कसं कराल? असा प्रश्न उपस्थित करत यापुढे करणसोबत काम न करण्याचे संकेत काजोलने दिले.

2016 हे वर्ष काजोल आणि करणच्या मैत्रीसाठी लाभदायक ठरलं नाही. अजय देवगन आणि करणचे खटके उडाल्याने 25 वर्षांची मैत्री संपुष्टात आली. करण जोहरने आपल्या आत्मचरित्रातही ती आपल्या आयुष्याचा भाग नसल्याचा उल्लेख केला आहे.

अजयचा 'शिवाय' आणि करणचा 'ऐ दिल..' एकाच दिवशी रिलीज होणार होते. मात्र अजयचा सिनेमा फ्लॉप व्हावा, म्हणून करणने निगेटिव्ह पब्लिसिटी करण्याचे पैसे दिले, असा आरोप कमाल आर खानने पुराव्यानिशी केला. करणने आरोप नाकारले, मात्र या वादात काजोलने पतीची बाजू घेत करणशी मैत्री तोडली.