चेन्नई, बंगळुरुत 'कबाली'साठी कंपन्यांकडून सुट्टी जाहीर !
एबीपी माझा वेब टीम | 20 Jul 2016 05:44 AM (IST)

चेन्नई : सुपरस्टार रजनीकांतचा बहुप्रतिक्षीत कबाली हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. प्रदर्शनाआधीच या सिनेमाने अनेक विक्रम केले आहेत. त्यातच आता नवा विक्रम होण्याची शक्यता आहे. कारण चेन्नई आणि बंगळुरुतील अनेक कंपन्यांनी 'कबाली'च्या प्रदर्शनादिवशी म्हणजेच 22 जुलैला सुट्टीच जाहीर केली आहे. दक्षिण भारतीय सिनेमांमध्ये रजनीकांत जे काही करेल, ती स्टाईल होऊन जाते. टॉलिवूडमध्ये रजनीकांतला अक्षरश: देवाचं स्थान आहे. त्यामुळेच चाहते रजनीकांतच्या आगामी कबाली सिनेमाची अक्षरश: चातकाप्रमाणे वाट पाहात आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी 22 जुलैला सुट्टीच जाहीर केली आहे. आजारपणाची सुट्टी, किरकोळ रजा यासारखी कारणं देत अनेकांनी सुट्ट्या टाकल्या होत्या. मात्र त्याचं प्रमाण वाढत असल्यामुळे, कंपन्यांनी त्या दिवशी सुट्टीच जाहीर केली. कबालीच्या प्रदर्शनादिवशी कर्मचारी दांड्या मारुन फोन स्विच ऑफ ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमच्या कंपनीने थेट सुट्टीच जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसप्रमाणे कबाली बोनस म्हणून ही सुट्टी देण्यात आली आहे, असं ओपस वॉटरप्रूफिंग कंपनीचे प्रमुख मनोज पुष्पराज यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितलं.