मुंबई : 'कयामत से कयामत तक' चित्रपटातून गाजलेली जोडी म्हणजे मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आणि ब्यूटी विथ ब्रेन जुही चावलाची. जुही आणि आमीर यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केल्यामुळे चाहत्यांनाही त्यांची जोडी आवडत होती. मात्र जुही-आमीर एकमेकांशी तब्बल पाच ते सहा वर्ष बोलत नव्हते.


जुही चावला आणि आमीर एकमेकांचे बेस्ट फ्रेण्ड्स होते. दोघांमध्ये घट्ट मित्रांप्रमाणे शेअरिंग आणि केअरिंग होतं. दोघांमध्ये क्षुल्लक कारणांवरुन वादावादी व्हायची, मात्र हे रुसवे-फुगवे काही वेळातच मिटायचे. 'इश्क' चित्रपटाच्या सेटवर झालेल्या एका भांडणाची कटुता मात्र दीर्घकाळ टिकली.

कयामत से कयामत तक (1988) नंतर लव्ह लव्ह लव्ह (1989), तुम मेरे हो (1990), दौलत की जंग (1992), हम है राही प्यार के (1993), अंदाज अपना अपना (1994), आतंक ही आतंक (1995), इष्क (1997) असे सलग आठ सिनेमा त्यांनी एकत्र केले. मात्र इष्कनंतर दोघांचा एकही एकत्रित (लक बाय चान्स आणि बॉम्बे टॉकिज सारख्या मल्टिस्टारर गेस्ट अपिअरन्सचे अपवाद वगळता) सिनेमा आलेला नाही.

इश्क नंतर आमीर आणि जुही तब्बल पाच ते सहा वर्ष एकमेकांचं तोंडही बघत नव्हते. जुहीला आपल्याशी बोलायचं नाही, असा आमीरचा समज झाला, तर आमीरला हे भांडण सोडवण्यात रस नाही, असा ग्रह जुहीने करुन घेतला. त्यामुळे दोघांचा अबोला अनेक वर्ष टिकून राहिला.

अखेर, पाच वर्षांनी जुहीने पुढाकार घेतला आणि आमीरसोबत असलेली कटुता संपवली. दोघांमधले गैरसमज दूर झाले आणि पुन्हा ते एकमेकांचे चांगले मित्र झाले.