सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज : अमिताभ
एबीपी माझा वेब टीम | 11 Oct 2016 11:42 AM (IST)
मुंबई : देशवासियांनी आज आपल्या सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज असल्याचं मत महानायक अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलं. अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना आज अमिताभ यांच्या 'जलसा' या बंगल्यावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. बॉर्डरवर सुरु असलेल्या घटनांमुळे देशातील जनता अतिशय संतप्त आहे. जवान आणि सैन्यदल प्राणांची बाजी लावत असल्याने मी आणि तुम्ही सुरक्षित आहोत. त्यांच्याप्रती एकता दाखवण्याची हीच वेळ आहे, असं बिग बी यावेळी म्हणाले. पाकिस्तानी कलाकारांबद्दल बिग बी म्हणाले... बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना बंदी घातल्याच्या मुद्दावरुन अमिताभ म्हणाले की, हा प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही. मला वाटतं की हे प्रश्न विचारणं योग्य नाही. 'मी राष्ट्रपती होणार नाहीच' राष्ट्रपती बनण्याच्या प्रश्नावर अमिताभ यांनी मजेशीर उत्तर दिलं. 'मजाक से हटकर सवाल पूछें', असं ते म्हणाले. राष्ट्रपतीपदासाठी शत्रुघ्न सिन्हा यांनी अमिताभ यांचं नाव पुन्हा चर्चेच आणलं. शत्रुघ्न बाबू चेष्टा करतात, हा त्यांचा बालिशपणा आहे. असं कधीही होणार आहे, असं अमिताभ यांनी स्पष्ट केलं. आमीर उत्कृष्ट अभिनेता आमीर खान हा उत्कृष्ट अभिनेता असून बॉक्स ऑफिस आणि बॉलिवूडवर तोच राज्य करतो. 'ठग' सिनेमात त्याच्यासोबत काम करण्याची चांगली संधी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. भविष्यात अधिकाधिक आव्हानत्मक काम करण्याची इच्छा काम करत राहणं आणि भविष्यात अधिकाधिक आव्हानात्मक काम करत राहिन, एवढीच माझी इच्छा असल्याचं अमिताभ बच्चन यांनी 74 व्या वाढदिवसाला व्यक्त केली. ऑक्टोबर महिन्यात अनेकांचे वाढदिवस आहेत. त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो, असंही ते म्हणाले.