मुंबई : पाकिस्तानी कलाकारांसाठी बॉलिवूडचे दरवाजे बंद करण्यात आल्यानंतर शाहरुखचा 'रईस' आणि करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल'वर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. रईसमधून माहिरा खानला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर आता 'ऐ दिल..'मधून फवादचीही हकालपट्टी करण्यात आली आहे.


'ऐ दिल है मुश्किल'मध्ये फवाद खानच्या चेहऱ्यावर सैफ अली खानचा मुखवटा चढवण्यात येणार आहे. रिप्लेसमेंट टेक्नॉलॉजीचा वापर करुन फवादच्या चेहऱ्याऐवजी सैफचा चेहरा वापरण्यात येईल. तर 'रईस' चित्रपटात माहिरा खान ऐवजी नव्या अभिनेत्रीला घेण्यात येणार आहे. उरीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात तीव्र रोष निर्माण झाला. तसंच मनसेनं पाकिस्तानच्या कलाकारांना विरोध करत हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला.

त्यानंतर आता 'ऐ दिल है मुश्कील'चा निर्माता करण जोहर आणि 'रईस' चित्रपटाचा निर्माता रितेश सिधवानी यांनी दोन्ही पाक कलाकारांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

शाहरुखच्या 'रईस'मधून माहिरा खानचा पत्ता कट?


विशेष म्हणजे ऐश्वर्या आणि अनुष्का या पाकच्या नागरिक असल्याचं सिनेमात दाखवण्यात येणार होतं, मात्र आता त्यांचं ऑनस्क्रीन नागरिकत्वही बदलण्यात येणार आहे. करण जोहर 'ऐ दिल..'च्या निमित्ताने चार वर्षांनी पुन्हा दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. कथेनुसार ऐश्वर्या आणि अनुष्का पाकिस्तानी नागरिक असतात. मात्र आता या कथेत बदल करुन त्या दुसऱ्या देशाच्या नागरिक असल्याचं दाखवण्यात येईल, असं वृत्त 'डीएनए' वृत्तपत्राने दिलं आहे.

मूळ कथेनुसार ऐश्वर्याने कवयित्री साबा तलियार खानची भूमिका साकारली आहे. तर अनुष्काने साकारलेली आलिझे ही तरुणी तिचं पहिलं प्रेम (फवाद) गमावते आणि पुन्हा दुसऱ्या तरुणाच्या (रणबीर) प्रेमात पडते.