नवी दिल्ली : अनेकांच्या विरोधाला बळी पडलेल्या पद्मावतीचा फैसला आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. राजपूत संघटना आणि करणी सेनेसह अनेकांनी पद्मावती सिनेमावर आक्षेप घेत त्याला विरोध केला आहे. त्यामुळे नुकतंच या सिनेमाचं 1 डिसेंबरला होणारं प्रदर्शन पुढे ढकलल्याची माहिती निर्मात्यांनी दिली होती. मीडिया स्क्रीनिंगवरुनही सेन्सॉर बोर्डानं निर्मात्यांची खरडपट्टी काढली होती.


दरम्यान पद्मावती सिनेमावरुन दिग्दर्शक संजय लिला भन्साळींना धमक्या दिल्या जात आहेत. चित्रिकरणावेळी सिनेमाच्या सेट्सवरही हल्ला करण्यात आला आहे. करणी सेनेनं पद्मावतीला समर्थन देणाऱ्या आणि पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या दीपिकाचं नाक कापण्याचीही धमकी दिली होती. तसंच तर काही संघटनांनी प्रेक्षकांना सिनेमाचं तिकीट काढण्यापूर्वी विमा काढून ठेवण्याचीही धमकी दिली होती.

दरम्यान पद्मावतीच्या सर्व वादानंतरही निर्मात्यांनी दोन संपादकांसाठी खास मीडिया स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं. दोघांनीही या सिनेमात काहीही आक्षेपार्ह नसल्याचं आपल्या कार्यक्रमांमध्ये सांगितलं होतं. यावरुनही सेन्सॉर बोर्डानं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. तसंच सिनेमाची कागदपत्र अपूर्ण असल्याचं कारण देत सेन्सॉर बोर्डानं सिनेमाची कॉपी परत पाठवली होती. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टात काय होतं याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.

कोण होती राणी पद्मावती?

सिंघलचे राजा गंधर्वसेन यांची कन्या पद्मावती. नितळ… आरस्पानी… आणि मनमोहक… सौंदर्याची खाण. ती इतकी सुंदर होती… की तिला मिळवण्यासाठी बड्या बड्या राजांनी देव पाण्यात ठेवले होते.

वडील गंधर्वसेन यांनी पद्मावतीच्या स्वयंवराचे आयोजन केलं. या स्वयंवरासाठी अनेक राजे उपस्थित होते. पण राणी पद्मावतीने चित्तोडचे राजा रावल रतन सिंह यांच्या गळ्यात माळ घातली. मात्र, या दोघांच्या सुखी संसाराला ग्रहण लागलं ते दिल्लीच्या तख्ताचं.

पद्मावतीच्या सौंदर्याबाबत दिल्लीचा सुल्तान अल्लाउद्दीन खिलजी ऐकून होता. त्यावर भाळलेल्या अल्लाउद्दीननं थेट चित्तोडवर आक्रमण केलं. पण चित्तोड किल्ल्याच्या सात मजली तटबंदीने खिलजी हैराण झाला.

अखेर खिलजीने केवळ पद्मावतीचे मुखदर्शन करण्यासाठी खलिता पाठविला आणि त्यानंतर किल्ल्याचा वेढा काढून घेण्याचं आश्वासन दिलं.

पण एखाद्या परपुरुषासमोर आपला चेहरा दाखवणं हा राजपुतांसाठी अपमान होता. तरीही युद्ध आणि रक्तपात टाळण्यासाठी पद्मावती राजी झाली. पण फक्त आरशाद्वारे मुखदर्शनाची अटही घालण्यात आली.

पद्मावतीच्या मुखदर्शनासाठी खिलजी किल्ल्यात दाखल झाला आणि तिच्या सौंदर्यावर फिदा झाला. त्याने आपला इरादा बदलला आणि राजा रतन सिंहला कैद केलं. जोपर्यंत पद्मावती आपल्याला शरण येत नाही, तोवर राजाला सोडणार नाही, अशी धमकीही दिली.

अखेर पद्मावतीने शरण येण्याची कबुली दाखवली. पण सोबत 700 दासी घेऊन येण्याची अट घातली.

पद्मावतीने 700 दासींऐवजी पालखीमध्ये चित्तोडच्या लढवय्या सैनिकांची भर्ती केली. मौका बघून खिलजीच्या छावणीवर हल्ला चढवला आणि राजा रतन सिंह यांची सुटका केली.

दगा झालेला पाहून खिलजी चवताळला. घमासान युद्ध सुरु झालं. चित्तोडचा अभेद्य किल्ला मुघलांनी भेदला. पण मुघलांच्या हाती लागण्यापेक्षा किल्ल्यातल्या स्त्रियांनी सती जाण्याचा निर्णय घेतला.

राणी पद्मावती यांच्यासमवेत तब्बल 16 हजार महिलांनी सामूहिक चितेमध्ये उडी घेतली यालाच राजस्थानमध्ये जोहार म्हणतात.

अशी होती… चित्तोडची स्वाभिमानी राणी… राणी पद्मावती…

संबंधित बातम्या

… तर पद्मावती रिलीज होऊ देणार नाही, यूपीचे उपमुख्यमंत्रीही विरोधात

‘पद्मावती’ चित्रपटाचं रीलिज लांबणीवर, निर्मात्यांची घोषणा

‘पद्मावती’च्या मीडिया स्क्रीनिंगवरुन सेन्सॉर बोर्ड नाराज

सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ सिनेमाची कॉपी परत पाठवली

‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर

एक दिल.. एक जान.. ‘पद्मावती’तील प्रेम-विरह गीत रीलिज

‘पद्मावती’चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन

‘पद्मावती’च्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

दीपिकाचा जबरदस्त लूक, ‘पद्मावती’चं नवं पोस्टर रिलीज

रणवीरच्या खिल्जीमुळे दीपिका अस्वस्थ, ब्रेकअपची चर्चा

रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलं