Gauri Sawant : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) अभिनीत आणि रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित 'ताली' (Taali) ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि गौरी सावंत (Gauri Sawant) चर्चेत आल्या. या सीरिजच्या माध्यमातून तृतीयपंथीयांसाठी लढा उभारणाऱ्या समाजसेविका गौरी सावंत यांचा संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आता एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमादरम्यान गौरी सावंत यांनी तृतीयपंथी दाढी कसे करतात याचा खुलासा केला आहे.


तृतीयपंथी दाढी कसे करतात?


तृतीयपंथी दाढी कसे करतात? याबद्दल बोलताना गौरी सावंत म्हणाल्या,"आम्हाला आमच्या गुरुची निवड करता येत नाही. जो उपलब्ध असतो तो आमचा गुरू होतो. आई-वडीलांच्या घरी साडी नेसतात हे आपल्याला माहिती असतं. पण साडी कशी नेसायची, कसं बसायचं हे मला माझ्या गुरुंनी शिकवलं आहे. पण नंतर दाढी यायला लागते. ती काढण्यासाठी आमच्याकडे एक चिमटा असतो. त्या चिमट्याने एक-एक केस ओढून काढायचा असतो". 


गौरी सावंत पुढे म्हणाल्या,"बाईपण सोप्पं नाही. आज सकाळी दाढी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमचा चेहरा हिरवागार झालेला असतो. शरीरात मेल हार्मोन्स आहेत. त्यामुळे चेहऱ्यावरचा एक-एक केस काढणं हा मोठा टास्क असतो. गुरूआई तिच्या मांडीवर ढोकं ठेऊन एक-एक केस काढते. दोन रुपयाच्या ब्लेडने दाढी केली तर दुसऱ्या दिवशी पुन्हा करावीच लागते. पण मुळापासून केस काढला तर तो 15 दिवसांनी येतो. या सर्व छोट्या-छोट्या गोष्टी आम्हाला आमच्या गुरू शिकवतात". 


गौरी सावंत म्हणाल्या,"माणूस हा समाजशील प्राणी आहे. बायलॉजिकल मी पुरुष आहे. त्यामुळे बाई होण्यासाठी मला माझं लिंग नको आहे, याची तयारी माझी मलाच करायची आहे. लिंग बदल करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. तृतीयपंथी आणि माझ्या गुरुंनी मला खूप प्रेम दिलं. सिग्नलवर भीक मागनं हा आमचा नाईलाज आहे. सरकारी नोकरीत आमचा विचार का नाही? उदरनिर्वाहाचं साधन दिलं तर भीक कशाला मागू?  असा प्रश्न गौरी सावंत यांनी उपस्थित केला आहे". 


'ताली' या वेबसीरीजबद्दल जाणून घ्या... (Taali Web Series Details)


'ताली' या वेबसीरिजला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ज्यांना समाजानं नेहमीच नाकारलं अशा तृतीयपंथीयांची गोष्ट सांगणारी 'ताली' ही सीरिज आहे. शिवीपासून टाळीपर्यंतची कहाणी सांगणारी 'ताली' ही वेबसीरिज आहे. या सीरिजमध्ये सुष्मिता सेन, नितेश राठोड, अंकुर भाटिया, कृतिका देव, ऐश्वर्या नारकर आणि विक्रम भाम महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. क्षितिज पटवर्धनने या सीरिजचे दमदार संवाद लिहिले आहेत. 



संबंधित बातम्या


Majha Katta : टाळी वाजवणं हा आमचा आक्रोश, राग आणि घुसमट आहे; विष्णूचं मोहिनी रूप चालतं मग आम्ही का नाही चालत?; श्रीगौरी सावंत यांचा सवाल