मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान हे कोणे एके काळी बॉलिवूडमधील सर्वात हॅपनिंग कपल मानलं जात असे. 13 वर्षांच्या संसारानंतर दोघांनी काडीमोड घेतला आणि बॉलिवूडपासून सर्वसामान्य चाहत्यांपर्यंत सर्वच हळहळले. मात्र हृतिक आणि सुझान हे दोघं पुन्हा विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.


घटस्फोटानंतरही हृतिक-सुझान अनेक वेळा एकत्र दिसले होते. रेहान, हृदान या दोन मुलांसोबत ते अनेक वेळा परदेशात फिरायलाही गेले. कंगनासोबत झालेल्या वादानंतरही सुझानने हृतिकची पाठराखण केली होती. त्यामुळेच दोघांनी परत यावं, अशा भावना अनेक जण व्यक्त करत असतात.

मुलांसाठी पुन्हा एकत्र येण्याचा हृतिक-सुझान यांचा विचार असल्याचं दोघांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे. हृतिक-सुझान एकमेकांना दुसरी संधी देण्याविषयी सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे.

दोघंही एकमेकांना अनेक वर्ष ओळखतात, त्यामुळे आपल्या मनातल्या भावना एकमेकांसमोर मांडण्यात दोघं मागेपुढे पाहणार नाही, असं त्यांच्या जवळची माणसं सांगतात.

डिसेंबर 2000 मध्ये हृतिक आणि सुझान यांनी बंगळुरुत एका छोटेखानी सोहळ्यात लगीनगाठ बांधली होती. 2006 मध्ये त्यांच्या रेहान आणि 2008 मध्ये हृदान या मुलांचा जन्म झाला. डिसेंबर 2013 मध्ये त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. त्यानंतर नोव्हेंबर 2014 मध्ये कोर्टाने दोघांना घटस्फोट मंजूर केला.